राज्यात मध्यरात्रीपासून 2जी इंटरनेट सेवा सुरू
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यापासून राज्यात तणावपुर्ण शांतता असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात अनेक सुविधांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु, जम्मू काश्मीरच्या नागरिकांना केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची भेट देत प्रशासनाने इंटरनेट सेवा सुरू केली आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाने राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू केली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्यात 2 जी मोबाईल इंटरनेट सेवांची सुरूवात करण्यात आली आहे. परंतु काही प्रणामात इंटरनेटवर प्रतिबंध करण्यात येणार आहे. याद्वारे ग्राहकांना 301 वेबसाईट्सच पाहता येणार आहे. तसेच सोशल मीडियासाठी वापरली जाणारी ऍप्स मात्र नागरिकांना वापरता येणार नाहीत.
जम्मू काश्मीर प्रशासनाने यासंदर्भात एक अधिसुचना जारी केली आहे. याद्वारे मोबाईल फोनवर 2 जी इंटरनेटवरील बंदी हटवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांना सर्च इंजिन, बॅंकींग, शिक्षण, बातम्या, प्रवास, सुविधा आणि रोजगार यासंबंधित वेबसाईट्सचाच वापर करता येणार आहे. पोस्टपेड आणि प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना आता डेटा सेवेचा लाभ घेता येणार आहा. जानेवारीपर्यंत मोबाईलवर जी इंटरनेटची सुविधा देण्यात येणार आहे. त्यानंतर याची समीक्षा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे या अधिसुचनेत म्हटले आहे.
राज्यात परिस्थिती सामान्य होत असल्याचा अहवाल सुरक्षा यंत्रणांनी दिल्यानंतर इंटरनेट सेवांवरील निर्बंध काही प्रणामात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 ऑगस्ट रोजी राज्यात या सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या. यानंतर अनेक स्तरातून याला विरोध झाला होता. सुरक्षेच्या दृष्टीने अफवा पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. इंटरनेटवरील निर्बंधांमुळे काश्मीरमधील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांच्या अहवालानंतर प्रशासनाने राज्यात 2जी इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सऍपसारख्या ऍपच्या वापरावर मात्र बंदी कायम राहणार आहे. जर या ठिकाणची स्थिती सामान्य राहिली तर येत्या काळात पुन्हा एकदा हाय स्पीड इंटरनेट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.