सातारा – सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचं ठरवलं आहे. यंदा मोठे देखावे व सजावट टाळून तो खर्च पूरग्रस्तांना देण्याचे नियोजन गणेश मंडळांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे मान्यवरांनी ठरवले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात संवेदनशील माणुसकीच्या खऱ्या देखाव्याचे दर्शन घडणार आहे.
आपले सख्खे शेजारी असणाऱ्या सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाने हैदोस घातला आणि अगदी सगळं होत्याचं नव्हतं केलं. या परिस्थितीत पूरग्रस्त उभे राहत असताना त्यांना बळ देण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत साताऱ्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी यंदा देखावामुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. देखाव्यात होणारा अतिरिक्त खर्च पूरग्रस्तांच्या उभारणीसाठी देण्याचेही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले आहे. संकटकाळात मदत करण्याच्या सातारकरांच्या या वृत्तीमुळे सांगली कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांना पुन्हा नव्याने उभे राहण्याचे बळ मिळणार आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांसह स्वंयसेवी संस्थांचाही पुढाकार अपेक्षित आहे.
यांनी ठरवलं “यंदा नो जिवंत देखावा…’
साताऱ्यातील बाल विकास गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ, राजकमल गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, श्री फुटका गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, गजराज गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ, अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ, खणआळी गणेशोत्सव मंडळ, राजपथ सातारा, समर्थ गणेशोत्सव मंडळ, मंगळवार पेठ समर्थ मंदिर आणि मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ, राजपथ सातारा.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकरांची एकी हवी!
नैसर्गिक आपत्तीमुळे सातारा शहरातील जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळांनी हे देखावे रद्द करून त्याचा निधी पूरग्रस्तांकडे देण्याचे निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर उत्सव काळात सातारकरांनी अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन पूरग्रस्तांना खंबीर मदत करण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकरांची दाखवलेली एकी कौतुकास्पद आहे.