-माधव विद्वांस
मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रसिद्ध करणारे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची उद्या जयंती. त्यांचा जन्म पुणे येथे 12 जुलै, 1864 रोजी झाला. काही ठिकाणी 24 जून 1863 अशीही त्यांची जन्मतारीख आढळते. वर्ष 1882 मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेज व मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बीए झाले. वर्ष 1891 मध्ये ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.
ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वर्ष 1889 मध्ये त्यांचा विवाह झाला होता, पंरतु 1892 मध्येच त्यांची पत्नी निवर्तली. मात्र, त्यांनी दुसऱ्या विवाहाचा विचारही न करता स्वतःस प्रापंचिक पाशातून कायमचे सोडवून घेतले. पत्नीच्या निधनानंतर 1893 मध्येच त्यांनी नोकरी सोडली व इतिहास संशोधनास वाहून घेतले. इतिहास संशोधनासाठी पुणे, सातारा, वाई, धुळे, मिरज, तळेगाव-दाभाडे इत्यादी ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. या कार्यासाठी ते महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधात सतत हिंडत असत. इतिहासाबरोबर ते भाषाशास्त्र, व्याकरण यावरही संशोधन व लेखन करीत होते. 1894 पासून स्वतः सुरू केलेल्या “भाषांतर’ तसेच कोल्हापूर येथील “समर्थ’, “ग्रंथमाला’, “विश्ववृत्त’, “सरस्वती मंदिर’, “प्राचीप्रभा’ इत्यादी नियतकालिकांतून ते भरपूर लिहू लागले.
1898-1917 या 19 वर्षांच्या कालखंडामध्ये “मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या शीर्षकाचे मराठी साधनांचे बावीस खंड त्यांनी संपादित केले. “राधामाधवविलासचंपू’ आणि “महिकावतीची बखर’ हे दोन जुने ग्रंथ त्यांनी अनुक्रमे 1922 व 1924 मध्ये संपादित करून प्रसिद्ध केले. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, निङ्तविचार, सुबंतविचार, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहतकाल असे काही त्यांनी संपादिलेले व लिहिलेले ग्रंथ प्रकाशित झाले. मराठी धातुकोश, नामादिशब्दव्युत्पत्तिकोश इत्यादी ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. त्यांच्या ग्रंथांच्या प्रस्तावनाही विस्तृत असत. राजवाडे भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी बहुविध विषयांवर व्यासंगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान, इतिहास संशोधक म्हणून विशेष मान्यता पावले.
साधनांचा उपयोग करून “मराठा सत्तेचा इतिहास’ ग्रॅंट डफने इंग्रजीतून बराच सविस्तर लिहिला होता. राजवाडे यांनी मात्र असा इतिहास न लिहिता इतिहासाची साधने संकलित करण्यावर भर दिला होता. मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रसिद्ध करू लागल्यामुळे राजवाड्यांचा बोलबाला होऊ लागला. राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमविण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. अस्सल आणि अमूल्य अशी कागदपत्रे त्यांनी देशाच्या सर्व भागांतून, शहरांतून व खेड्यांतून अखंड भ्रमंती करून जमविली. तथापि, संत रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी त्यांनी पुष्कळ लिहिले. अनेकदा इतिहास लेखक, संशोधक यांच्यावर चरित्रनायकाचा प्रभाव असतो, त्यामुळे त्याविषयी लेखन होताना बरेचदा लेखकाची चरित्र नायकास सहानुभूती मिळते.
ऐतिहासिक कादंबरीत त्यामुळे बरेचदा वस्तुस्थितीचा विपर्यास होण्याची शक्यता असते. त्यावर मग वादंगही उठतात. त्यांनी पुण्याच्या प्रसिद्ध भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना 7 जुलै 1910 रोजी खं. चिं. मेहंदळे यांच्या सहकार्याने केली. इतिहासास जरी वाहून घेतले होते तरी समाजकार्यही सुरू होते, समाजशास्त्र मंडळ आणि आरोग्यमंडळ अशा संस्थांही त्यांनी उभ्या केल्या.एवढेच नव्हे तर रेल्वे प्रवाशांची संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. 31 डिसेंबर 1926 रोजी या इतिहासाचार्याचे निधन झाले.