कोल्हापूर – विशाळ गड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये आंबा घाटाच्याजवळ मुख्य सह्याद्रीच्या पर्वत रांगेला लागून वसलेला आहे.
विशाळ गड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1 हजार 130 मीटर उंच आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील दुसरा राजा भोज याने सुमारे इ.स. 1058 साली कोल्हापूर बाजारपेठा आणि कोकणातील बंदरे जोडणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला.
हा किल्ला सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि विजापूर संस्थांन म्हणजे राजवटीतील सिद्धी जोहर यांच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याचे काही बांधकाम आणि डागडूजी करण्यासाठी सुमारे 5 हजार होन खर्च केले होते.
पूर्वीच्या लोकांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले. काहींना वीरमरणदेखील आले. या किल्ल्यावर भगवंतेश्वर मंदिर, राजवाडा, बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी, मुंडा दरवाजा, पावनखिंड आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. – विवेक वि. सरपोतदार, इतिहास अभ्यासक