पुणे – महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिरात अनेकदा प्रेक्षकांना नाट्यगृह परिसर आणि आतही पुरेशी स्वच्छता नसल्याची तक्रार केली आहे. याच नाट्यगृहांबद्दल पुरेशी स्वच्छता नसल्याच्या मुद्यावर अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहातील स्वच्छतेबाबत तिने आपलं मत सोशल मीडियावर मांडले आहे.
कलाकारांना नाट्यप्रयोग करतांना नाट्यगृहांमध्ये अनेक प्रश्नांना तोड द्यावे लागते. तिने कलाकारांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वक्तव्य केले आहे. सध्या तिची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
,’ बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे ला ” कुर्रर्रर्रर्र “चा प्रयोग झाला.
सातत्याने गंधर्व बद्दल बातम्या कानावर येत आहेत.. बांधकाम करायचं आहे.. पण म्हणून आत्ता जे नाटका साठी वापरात येत आहेत त्याची काळजी घ्यायला नको का?
बालगंधर्व.. जिथे प्रयोग करायला आम्ही कलाकार मंडळी आसुसलेले असतो. पण तिथे ग्रीनरूम मध्ये गेल्यावर मात्र जीव नकोसा होतो.
मेकअपरूम ची अवस्था भयाण असते. स्वच्छता याचा काहीही संबंध नसतो.. आरसे डागळलेले.. Makeup box ठेवायला त्या खालचा कट्टा जेमतेम, बसायला “खुर्च्या” नुसत्या म्हणायला.. चारपाय आणि बुड टेकायला एक फळी प्लास्टिक ची इतकीच तीची खुर्ची म्हणून ओळख.. ती कधीही तुटेल अशी तीची अवस्था.. त्यात मी बसले तर पुढच्या प्रयोगातील माणसांची गैरसोय होईल म्हणून मी बसतही नाही..
आणि मग वेळ येते ती तिथल्या बाथरूम ची.. अतिशय घाण. अस्वछ..वास.. कधी कधी नुसतच मरणारंच फिनेल मारून ठेवतात.. पण बाकी अस्वछच.. काहीच कशी फिकीर बाळगत नसावेत…?
बालगंधर्व च्या प्रयोगा नंतर मी कायम युरीन इन्फेकशन घरी घेऊन जाते.प्रयोग संपल्यावर प्रेक्षक फोटो काढायला म्हणून येतो तेव्हा मला उगाचच लाज वाटते.. तिथे लॉबी मध्ये येणाऱ्या घाणेरड्या वासाची.काय म्हणतील लोक? लोक काही ही म्हणत नाहीत…!
आणि ac ची सोय.. त्या ac ला आपला जन्म थंड हवा देण्यासाठी झालाय हे माहितीच नसावं…इतका तो निवांत फुंकत बसलेला असतो. बर ह्याबद्दल तक्रार करावी तर, तर तिथले कर्मचारी म्हणतात.. कीं तो स्लोच आहे.. मग काय आम्ही स्टेजवर घाम गाळीत करतोय अभिनय.
श्वास जो एकेक वाक्य घेताना पुरावायचा, तो घेता येणं मुश्किल होतं आणि त्यात movment ची धावपळ…timming साधायच, कपडे बदल, ही तारेवरची कसरत असते..
घामामुळे कपडे चिकटलेले असतात.. जवळ जवळ कापडं खेचून काढावी लागतात. त्यामुळे चेंजिंग ची वेळ बदलते.. अमुक वेळातच व्हायला हवं ते घडत नाही.
वारं नसतंच तिथे. त्यामुळे कामं करा आणि राहिलात तर जगा किंवा मग मरा.
भाडे मात्र नीट आकारलं जातं.
आण्णाभाऊ साठे.
तिथेही तेच..अस्वच्छ बाथरूम, अंधारलेले भकास green रूम..,AC ची बोंब, आणि तिथेले स्पीकर गायब झालेले.. थिएटरचे स्पीकर चोरीला गेले.. त्यामुळे त्याचा भुर्दंड पुनः कंपनीला.
Lights ची सोय फक्त एकाच पट्टी मधले ले lights चालू स्थितीत… बाकी नाहितच.प्रयोगनंतर जेवायला घेतो आम्ही अहो.. साधं बसायला खुर्च्या नसतात.. जिथे जेवायला घेणार तिथे मोडक्या लाकडी फळ्या एकावर एक टाकलेल्या.. त्यावर बसायला गेलो तर कुल्ले सोलवटुन निघतील. काहीच सोय नाही.
आणि सगळ्या तुटक्या मोडक्या, गायब सोयीसाठी साठी भाडं मागितलं जातं.
अतिशय निंदनीय आहेत.
आपली परंपरा टिकविण्यासाठी. रंगभूमी टिकून राहावी, थोडेच पैसे मिळवावे म्हणून,
म्हणून आम्ही सगळे कलाकार जीवाचं रान करतो. मग तिथले व्यवस्थापक, जे आहे त्याची डागडुजी करून का घेत नाहीत..आहे, ते जपत का नाही? जाऊदे,आत्ता काय मोडायचं आहे. म्हणून दुर्लक्ष करणारी कर्मचारीं मंडळी
ह्या सगळ्या च काय करायचं? आत्ता कोकण गोवा दौरा केला.. मग त्यामानाने तिथली अवस्था बरी आहे.
उन्हाळा कडक आहे यंदा .हे उत्तर मात्र सगळीकडे सारखंच.
( आत्ता खरंतर ही post खरंच चर्चेत यावी… असं मनापासून वाटतं.. माझ्या सगळ्या मीडिया दोस्ताना विनंती.)
दरम्यान विशाखा सुभेदारने केलेल्या या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. तिच्या या पोस्टला कलाकारांनी शेअर करत म्हंटले आहे की,’सर्वच कलाकारांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे । कॉन्ट्रॅक्टर ला सांगा की बेसिक सुविधा असतील तरच शो करू।’ असं म्हणत आपलं मत मांडलं आहे.