डोर्लेवाडी – नीरा नदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वीर धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे दोन वक्र दरवाजे चार फुटांनी उचलून नीरा नदी पात्रात 9 हजार 274 क्युसेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून सध्या वीर धरणातून (दि.14) नीरा नदीपात्रात 23 हजार क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बारामती परिसरामध्ये पावसाने ओढ दिल्याने शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पुणे जिल्ह्यातील वीर धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये नीरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
याचा फायदा बारामती आणि फलटण तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना होणार आहे. आता वर्षभरासाठी शेती सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे.
दरम्यान, नदीकाठावरील शेतकरी सुखावला आहे. या पाण्याचा येत्या रब्बी हंगामातील पिकांना लाभ होणार आहे.
ऊस शेती बहरणार
बारामती तालुक्यातील शिरसर्णे, कांबळेश्वर, सांगवी, खांडज, शिरवली, नीरा वागज, घाडगेवाडी, मेखळी, सोनगाव, तावशी (इंदापूर) तसेच फलटण तालुक्यातील कांबळेश्वर, तरडे, आसू, पवारवाडी, इंदापूर तालुक्यातील उद्धट, तावशी, कुरवली आदी गावांतील शेतीला पाणी पुरवठा होणार आ्रहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक ठरले आहे.
तसेच भूजलपातळीत वाढ होणार आहे. नीरा नदीकाठी ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बागायती शेतीला दिलासा मिळाला आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरापुरता तरी मिटला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.