हैदराबाद – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम ही राज्याची पुढील राजधानी असल्याची घोषणा केली आहे. खरं तर, 2014 मध्ये, जेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशातून वेगळे झाले तेव्हा हैदराबादला 10 वर्षांसाठी दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हैदराबाद तेलंगणाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत आंध्र प्रदेशला 2024 पूर्वी राजधानीची घोषणा करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार ही घोषणा करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत मोठी घोषणा केली. मी तुम्हाला विशाखापट्टणम येथे आमंत्रित करण्यासाठी आलो आहे, जी आमची राजधानी असेल. मी पण विझागला शिफ्ट होणार आहे.
यापूर्वी 23 एप्रिल 2015 रोजी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देशमच्या सरकारने अमरावती शहराला आंध्र प्रदेशची पुढील राजधानी म्हणून घोषित केले होते. यानंतर 2020 मध्ये जगन सरकारनेच आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्या असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूलची नावे समोर आली. मात्र, नंतर वायएसआर कॉंग्रेस सरकारने हा निर्णय मागे घेत अमरावतीला राजधानी बनवण्याची चर्चा केली होती.
विशेष म्हणजे वायएसआर कॉंग्रेस अमरावतीमधील जमीन घोटाळ्याचा टीडीपीवर सातत्याने आरोप करत आहे. विशेषत: टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. रेड्डी सरकारनेही या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अमरावतीतील अनेक ठिकाणांबाबत कृती आराखडा आधीच उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, चंद्राबाबू नायडू यांनी हे आरोप साफ फेटाळून लावले होते.