नवी दिल्ली- कोविड-19 साथीची परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी, 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक कमी करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली होती. आता भारतात येणाऱ्या आणि भारताबाहेर जाणाऱ्या परदेशी आणि भारतीय नागरिकांसाठी व्हिसा आणि वाहतुकीतील निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणूनच, अधिकृत विमानतळ आणि बंदर इमिग्रेशन चेक पोस्ट्सद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे टूरिस्ट व्हिसाशिवाय इतर ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना आणि इतर परदेशी नागरिकांना इतर कोणत्याही उद्देशाने भारतात भेट देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वंदे भारत मिशन, एअर ट्रान्सपोर्ट बबल व्यवस्था किंवा नागरी उड्डयन मंत्रालयाने परवानगी दिलेल्या कोणत्याही नॉन शेड्यूल व्यावसायिक उड्डाणांद्वारे चालविल्या जाणाऱ्या उड्डाणांचा समावेश आहे. अशा सर्व प्रवाशांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विलगीकरण आणि कोविड -19 बाबतीतील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
या शिथिलतेअंतर्गत, इलेक्ट्रॉनिक व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि वैद्यकीय व्हिसा वगळता अन्य सर्व व्हिसा तातडीने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा व्हिसाची वैधता कालबाह्य झाल्यास, नवीन व्हिसा संबंधित भारतीय दूतावासाकडून मिळू शकतात. वैद्यकीय उपचारासाठी भारतात येण्याची इच्छा असलेले परदेशी नागरिक वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतात. या निर्णयामुळे परदेशी नागरिकांना व्यवसाय, परिषद, रोजगार, अभ्यास, संशोधन, वैद्यकीय इत्यादी विविध कारणांसाठी भारतात येणं शक्य होईल.