करोनाच्या संकटात खेळाडूंनाच नव्हे तर सर्वसामान्य व्यक्तींनाही मानसिक सक्षमतेसाठी झगडावे लागले. मात्र, हा धोका काहीसा कमी झाल्यानंतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या ऑनलाइन स्पर्धांमुळे का होईना पण अनेकांना दिलासा मिळाला. यात केवळ खेळाडूच होते असे नाही तर सर्वसामान्य व्यक्तीही होत्या.
हौशी स्तरावर तेव्हा अनेकांनी विविध ऑनलाइन स्पर्धांमध्ये भाग घेतला. नुसताच भाग घेतला नाही तर त्यात यशही मिळवले. प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण याने सुरू केलेल्या “पिंकेथॉन’लाही असेच सर्वदूर यश मिळत आहे. या स्पर्धेत केवळ देशातच नव्हे तर परदेशातूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मॅरेथॉनच्याच धर्तीवर होत असलेल्या या स्पर्धेत 42, 22, 10, 5 व 3 किलोमीटर अशा अंतरात स्पर्धा घेतल्या जातात. स्ट्राव्हा या नव्या ऍपच्या माध्यमातून स्पर्धक आपली नाव नोंदणी करतात व त्यांनी नेमून दिलेल्या वेळत सहभागी होतात. त्यांना स्पर्धेतील सहभागाचे प्रशस्तिपत्रक, पदक किंवा सहभागासाठी देण्यात येणारे टी-शर्ट देखील कुरीअरने मिळतात.
आता अनेक लोक याबाबतही नाक मुरडताना दिसतात. ऑनलाइन स्पर्धा म्हणजे भंपकपणा आहे अशी टीकाही काही लोकांनी केली आहे. मात्र, स्पर्धेचा भाग सोडा त्यात सहभागी होत जर प्रत्येकाची मानसिक क्षमता पूर्ण तंदुरुस्त राहात असेल तर ती स्पर्धा कोणतीही असो ती यशस्वीच म्हटली पाहिजे. आता यात स्पर्धकांना प्रोत्साहन देत असलेल्या प्रज्ना पुजारी व त्यांचे पती चेतन पुजारी यांच्यामुळे सुनीता जाधव यांच्यासारख्या कार्यतत्पर महिलादेखील सातत्याने सहभाग घेत आहेत व यशस्वीही होत आहेत.
सुनीता यांनी प्रज्ना यांच्या प्रोत्साहनामुळे 2019 सालच्या अखेरपासून आतापर्यंत 7-8 स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. फार्मास्युटिकल क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुनीता यांनीच नवरात्र पिंकेथॉन स्पर्धेत सहभागी होतानाही आपली परंपरा जपली. चक्क नववारी साडी नेसून त्या आणि प्रज्ना या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. स्ट्रावा ऍपवरून स्पर्धकांना वेळ दिली जाते व त्याच वेळेत ही रन पूर्ण करावी लागते. फिटेस्ट मॅन ऑफ इंडिया असे संबोधला जात असलेला मिलिंद सोमण अशाच कार्यकुशल महिलांना एकत्र आणून ही रन आयोजित करतो. या रनमधून उद्या देशाला स्पर्धक मिळणार हादेखील विश्वास आहे. कारण धावपटू किती वयाचा आहे याला महत्त्व नाही तर तो त्या वयातही काय कामगिरी करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. अशा स्पर्धा दरवर्षी जास्तीत जास्त प्रमाणात झाल्या किंवा होत राहिल्या तर या माध्यमातून सगळ्यांचीच मनस्थिती सक्षम राहील यात शंका नाही.