नाशिक – वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे सन १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्वतः च्या जीवावर उदार होऊन सहकारी सैनिकांचे प्राण वाचविले होते. देशासाठीचे त्यांचे हे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनामार्फत त्यांना दोन हजार फुटाची जागा निवास बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वर्षी २३ जानेवारीलाच साळवे यांचे कुटुंब नवीन घरात प्रवेश करेल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
येवला येथे वीरचक्र पुरस्करार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी मंत्री दादाजी भुसे होते. यावेळी आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे, कल्याणराव पाटील,माजी जि. प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सैनिक कल्याण मंत्री भुसे पुढे म्हणाले की,सैनिकाविषयी आदर कृतीतुन व्यक्त करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. माजी सैनिक, शहीद कुटुंब यांच्या कार्याचे मोल होऊ शकत नाही म्हणून त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्राचे मूळ निवासी असलेल्या माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवांना, वीर जवानांच्या अवलंबितांना त्यांच्या नावे असलेल्या एका मालमत्तेवर कर माफी देण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांना पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहेत व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील मुलांसाठी येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर नाशिक येथे मुलींसाठी सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे, असेही यावेळी माजी सैनिक कल्याण मंत्री भुसे यांनी सांगितले.
वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी -भुजबळ
सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच समाजानेही सैनिकांचा आदर, सन्मान करायला हवा, त्यांची काळजी घ्यायला हवी. तसेच शेतकरी हा अन्नदाता असतो, त्याच्या कष्टकरी हातांनाही बळ दिले पाहिजे. वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी आहे. म्हणूनच आज एका जवानाला हक्काचे घर देताना, त्या घराचा पाया रचण्याचा बहुमान हा एका शेतकरी जोडप्याला देऊन ‘जय जवान जय किसान’ आपण एकप्रकारे या दोघांचा गौरव केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.