हैद्राबाद – भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या तडाखेबाज नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट विंडिजवर ६ गडी आणि ८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.विजयासाठीचे २०८ धावांचे आव्हान भारतीय संघाने १८.४ षटकांत ४ बाद २०९ धावा करत पूर्ण केले.
भारताकडून विराटने ५० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारासह सर्वाधिक नाबाद ९४ धावा केल्या आहेत. या सामन्यात विराटची खेळी अविस्मरणीय ठरलीच पण त्याचे सेलिब्रेशनही तितकेच अनोखे ठरले. वेस्ट इंडिजची टीम त्यांच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखली जाते. यानुसार केजरिक विल्यम्स हा गोलंदाजी करताना विकेट मिळवल्यानंतर प्रतिकात्मक स्वरुपात फलंदाजाचं नाव आपल्या डायरीत लिहून ते पान फाडण्याचा अभिनय करतो. मात्र विराटने आज विल्यम्सचा डाव त्याच्यावर उलटवत बाजी मारली.
दरम्यान, लोकेश राहुलने ४० चेडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६२ धावा करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. रोहितने ८, रिषभ पंतने १८, श्रेय्यस अय्यरने ४ धावा केल्या. विंजिजकडून गोलंदाजीत ख्यारी पिएरेने २ तर काॅटरेल आणि पोलार्डने प्रत्येकी १ गडी बाद केला.