पुणे – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली विनाकारण आक्रमक होत मैदानावरील पंचांशी हुज्जत घालतो. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर त्याला काहीतरी वाद घालायचाच असतो. याची दखल आयसीसी व बीसीसीआय तसेच सामनाधिकाऱ्यांनी घ्यावी व शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी इंग्लंडचे माजी कसोटीपटू डेव्हिड लॉईड यांनी केली आहे.
कोहली संघाचे नेतृत्व करतो, पण अनेकदा तो भर मैदानावर पंचांशी वाद घालताना दिसला आहे. पंचांना आदर दाखवण्यातही त्याला कमीपणा वाटतो. पंचांचा एखादा निर्णय भारतीय संघाच्या विरोधात गेला तर लगेचच तो पंचांकडे धाव घेत त्यांच्याशी हुज्जत घालतो. त्याचे वर्तन अयोग्य आहे. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचेच दिसून येते. मैदानावरील पंचांनी किंवा तिसऱ्या पंचांनी एखादा निर्णय दिला तर त्याचा आदर राखला गेला पाहिजे. मात्र, कोहलीला हे मान्यच नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तसेच सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तर हे वारंवार दिसून आले आहे. मैदानावरील पंचांना दबावाखाली ठेवण्याचा कोहलीचा सातत्याने प्रयत्न असतो. ही एक प्रकारची मनमानीच झाली. त्याला आयसीसी, बीसीसीआय तसेच सामनाधिकारी यांनी वेळेवर समज दिली पाहिजे तसेच शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्याला नियमानुसार काही सामन्यांतून वगळले पाहिजे तरच त्याला त्याची चूक लक्षात येईल व नंतर त्याच्या वर्तनातही फरक पडेल, अशी मागणीही लॉईड यांनी केली.
कोहलीने चौथ्या टी-20 सामन्यानंतर सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. सूर्यकुमार यादवचा झेल इंग्लंडच्या डेविड मलानने पकडला, त्यावेळी चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. पण तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याचे सांगत सॉफ्ट सिग्नलच्या आधारे सूर्यकुमारला बाद दिले. यावरून कोहलीने पंचांशी वाद घातला होता. जर त्याला एखादा निर्णय पटला नसेल तर त्याने सामना संपल्यावर कर्णधाराच्या पंचांबाबतच्या अहवालात नमूद करावे, पण त्यांच्याशी गैरवर्तन करू नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मैदानावरील पंचांना जास्त अधिकार मिळावा यासाठीच सॉफ्ट सिग्नलचा नियम आहे व इंग्लंडने अहमदाबादमध्ये पंच नितीन मेनन यांच्यावर दबाव टाकल्याचा कोहलीचा समज झाला व त्याने मेनन यांच्याशी वाद घातला. केवळ हाच सामना नव्हे तर, कोहली या संपूर्ण मालिकेतच पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यावर आता अत्यंत कठोर कारवाई केली गेली पाहिजे, असेही लॉईड यांनी म्हटले आहे.