कोल्हापूर/प्रतिनिधी – केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने तीनही सेनादलाच्या नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ या भरती प्रक्रिया विरोधात संपूर्ण देशभरामध्ये सध्या विद्यार्थ्यांमध्ये रोष पहावयास मिळत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देखील अग्निपथ या योजनेचा विरोध केला असून आज कोल्हापूर येथे टेंबलाई मंदिर येथे मोर्चा आयोजित करून आर्मी भरती कार्यालय व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात येणार आहे.
गेल्या तीन वर्षापासून कोरोनामुळे जवानांची भरती होऊ शकली नाही. गेली अनेक वर्षे सैन्यदलामध्ये भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांमध्ये यामुळे अस्वस्थता पसरली आहे. भरती केव्हा सुरू होणार याची उत्सुकता लागलेली असतानाच संरक्षण मंत्रालयाने नियमित भरती प्रक्रिया स्थगित करून अग्निपथ या हंगामी भरतीची योजनेची घोषणा केली आहे.
एकीकडे भविष्याची तजवीज म्हणून युवक सरकारी नोकरी कडे पहात असतात मात्र सैनिक भरती मध्ये केवळ उमेदीची चार वर्ष नोकरी झाल्यानंतर पुढील कोणतीही हमी अग्निपथ या योजनेमध्ये सरकारने दिली नाही. याशिवाय 2020 साली घेण्यात आलेल्या शारीरिक व वैद्यकीय चाचण्या मध्ये पास झालेल्या युवकांची देखील लेखी परीक्षा घेऊन नियुक्ती अद्याप दिलेली नाही. तसेच 2020-21 सालच्या नियमित भरती प्रक्रिया देखील अद्याप प्रलंबित आहेत.
केंद्र सरकार अग्निपथ योजनेमुळे जवानांच्या संख्येत वाढ होणार असे म्हणत जरी असले तरी देखील सरासरी एका वर्षी अग्निपथ योजनेतून एका तालुक्यातील फक्त साठ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. यापूर्वी हाच आकडा साधारणपणे 100 पेक्षा जास्त होता.
गेल्या आठ वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक वादग्रस्त निर्णय घेतले, ज्यामध्ये मुख्यता नोटबंदी, जीएसटी, शेतकरी कायदे आणि अग्निपथ.. सदरचे निर्णय घेत असताना लोकशाहीची जाणीव ठेवून समाजातील प्रतिनिधींकडून मत जाणून न घेता हे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकारला वेळोवेळी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. याचाच एक भाग म्हणून अग्नीपथ योजनेचे देखील असंतोष विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
राज्यामध्ये देखील अग्निपथ विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून कृती समितीच्या वतीने उद्या राज्यभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजता सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांचे एकत्रित आंदोलन टेंबलाई मंदिर कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे. या आंदोलनातून मोर्चाद्वारे सेना दलाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संदीप गिड्डे पाटील करत असून संयोजन राहूल पाटील, समाधान पाटील, आनंद राव पवार, अखिलेश वाले, आण्णासाहेब काकडे, महेश बोरनाक तानाजी डोईफोडे, प्रकाश थोरबोले, गणेश गारळे, सुशांत मिसाळ, संदीप कोळी, विजय वाघरे, दयानंद साळवी, सुरज गावडे, अभिजीत पाटील, दयानंद किल्लेदार, योगेश पाटील सुनिल पाटील, मनोज गायकवाड, अमित मालगावे, संपत सावंत करीत आहेत.