मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात ( Virat Kohli steps down as T20 captain) त्याने ट्वीटरवरून माहिती दिली. त्याचबरोबर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही टी-20 विश्वकरंडकानंतर आपला करार वाढवण्यास नकार दिला आहे.
आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वीच कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असून त्याने एक सविस्तर पत्रच बीसीसीआयला पाठवले असल्याचेही सांगितले आहे. या पत्रात कोहलीने पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच आभार मानले आहेत. रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपण हा निर्णय घेतल्याचेही कोहलीने पत्रात म्हटले आहे.
🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
भारतीय संघातून खेळण्याचीच नव्हे तर संघाचे नेतृत्व करण्याचीही संधी मला मिळाली, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. संघ सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि संघाच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे यश मिळवू शकलो नसतो.
एक खेळाडू तसेच एक कर्णधार म्हणून मनावर असणारा ताण समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये कर्णधारपद सांभाळताना मला आता स्वत:साठी वेळ हवा आहे. यापुढील काळात एकदिवसीय आणि कसोटी संघासाठी खंबीर नेतृत्व करण्यासाठी मी पूर्ण सज्ज राहू शकेन असे वाटल्यामुळेच मी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय घेण्यासाठी बराच वेळ लागला. ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर मी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडत आहे. माझ्या निर्णयाबाबत मी बीसीसीआयचे सचिव जय शहा, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीच्या सर्व सदस्यांशी बोललो आहे, असेही कोहली म्हणाला.
करार वाढवण्याची इच्छा नाही – शास्त्री
संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही बीसीसीआयशी असलेला करार वाढवण्यास नकार दिला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांचा करार टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत होता. मात्र, भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत हा करार वाढवण्याचा प्रस्ताव त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी यासाठी नकार दर्शविला आहे.
द्रविड होणार हंगामी प्रशिक्षक
विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून आता शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांना हंगामी प्रशिक्षक म्हणून संघाबरोबर पाठवले जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहेत. द्रविड यांच्याशी चर्चा झाली होती मात्र, त्यांची पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याची तयारी नसल्याने त्यांना केवळ याच दौऱ्यासाठी नियुक्त केले जाइल, असेही सांगिले जात आहे.