मुंबई – विराट कोहली याचा अहंकार वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संपूष्टात येणार आहे. कोहली या मालिकेद्वारे पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. टी-20 विश्वकरंडकानंतर कोहलीने संघाचे नेतृत्व सोडले आणि ते रोहित शर्माकडे दिले गेले.
या स्पर्धेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली. यावेळी भारताचे नेतृत्व रोहितने केले होते आणि संघाने विजयही मिळवला होता. मात्र, कोहली या मालिकेत खेळला नव्हता. त्याने या मालिकेसाठी विश्रांती घेतली होती.
टी-20 विश्वकरंडकातील एका सराव सामन्यासाठी रोहितकडे नेतृत्व देण्यात आले होते. या सामन्यात कोहली खेळणार नसल्याचे ठरले होते. पण या सामन्यात कोहली मैदानात उतरला आणि नेतृत्व करत होता. रोहितचे नेतृत्व त्याला सहन होत नसल्याची टीका त्यावेळी काही चाहत्यांनी केली होती.
मात्र, आता याच रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्याची वेळ कोहलीवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत येणार आहे. आतापर्यंत कोहली एकदाही आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखाली खेळलेला नाही. भारतीय संघात ही गोष्ट पहिल्यांदाच घडणार आहे. कर्णधारपद गेल्यानंतर कोहलीचा आक्रमकपणा तसाच राहतो की त्यात कोणता बदल होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.