मुंबई – भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज विराट कोहली याच्याकडून आता कसोटी संघाचे नेतृत्वही जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयमधील सुत्राने दिले आहेत.
वर्कलोड कमी करण्यासाठी कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडले होते. मात्र, त्यानंतर कोहलीकडून भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वही काढून घेतले गेल्यामुळे बीसीसीआय व कोहली यांच्यात मोठे वितुष्ट आल्याचे बोलले जात आहे.
कोहलीला 48 तासांत एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोडण्यास सांगितले गेले होते मात्र, त्याने यासाठी नकार दिल्यावर चक्क त्याची उचलबांगडी करत रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवली गेली. मात्र, तरीही बीसीसीआय व कोहली यांच्यात बेबनाव कायम असल्याने आगामी दक्षिण आफ्रिका दौर्यानंतर कोहलीकडून कसोटी संघाचे नेतृत्वही काढून घेतले जाणार असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे.
खेळाडू मुंबईत दाखल
भारतीय क्रिकेट संघ रविवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाला आहे. पुढील 3 दिवस ते हॉटेलमध्येच विलगीकरणात राहणार आहेत. त्यानंतर 16 डिसेंबरला सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. तिथे दाखल झाल्यावरही भारतीय संघ विलगीकरणातच राहणार आहे. त्यांचा तेथील कालावधी पूर्ण झाल्यावरत्यांना बायोबबल सुरक्षेतच सराव सपरु करेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका येत्या 26 डिसेंबरपासून (बॉक्सिंग डे) सुरू होणार आहे.
रोहितचा कसून सराव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे सर्व खेळाडू मुंबईत एकत्रीत सराव करणार असले तरी त्यापूर्वी मुंबईकर रोहितने नेटमध्ये कसून सराव सुरु केला आहे. आजवर इनकटर व इन स्विंग चेंडूवर सातत्याने अडचणीत सापडत असलेल्या रोहितने स्थानिक गोलंदाजांच्या गोलंदाजीवर याच चेंडूसमोर तंत्रशुद्ध फलंदाजीचा सराव केवा. तसेच अवेस्विंगवर व लेग कटरवर कट, पूल व हुक हे फटके मारण्याचाही सराव केला.