नवी दिल्ली – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाच्या कामगिरीचे परीक्षण माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महंमद कैफ याने केले असून त्याने कर्णधार विराट कोहलीवर टीका केली आहे.
कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ अस्थिर बनल्याचे माझे मत आहे. आजच्या घडीला संघातील त्याचे स्वतःचे सोडून अन्य कोणत्याही खेळाडूचे स्थान निश्चित नाही. जो खेळाडू भरात असतो त्यालाच खेळवण्याचा कोहलीचा कल असतो.
माजी कर्णधार सौरव गांगुली ज्या पद्धतीने संघातील नवोदितांना पाठिंबा द्यायचा तसेच त्यांना अपयश आले तरीही पुरेशी संधी द्यायचा ते कोहली करत नाही. संघात असलेल्या प्रत्येक खेळाडूच्या डोक्यावर टांगती तलवार असते. कामगिरी चांगली झाली नाही तर पुन्हा संधी मिळेल का याचीही शाश्वती खेळाडूंना नसते.
कोहलीच्या याच दृष्टिकोनामुळे खेळाडू प्रचंड दडपणाखाली असतात. कोहलीने कधीही हा विचार केला नाही त्यामुळेच संघ पूर्णपणे अस्थिर झाला आहे, असेही कैफने सांगितले.