अहमदाबाद -भारताचा कर्णधार विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक झेल सोडणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. 2019 सालापासून कोहलीची कामगिरी सुमार होत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून गचाळ क्षेत्ररक्षण झाले आहे. मात्र, कोहली एक चांगला क्षेत्ररक्षक समजला जातो, पण 2019 सालापासून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल कोहलीने सोडल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.
कोहलीने 2019 सालापासून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सहा झेल सोडले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांबरोबरच कोहलीकडून आयपीएलमध्येही अनेकदा झेल सुटले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही कोहलीकडून गचाळ क्षेत्ररक्षण झाले होते. इतकेच नव्हे तर, आत्ता इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतही कोहली एक क्षेत्ररक्षक म्हणून फारसा यशस्वी ठरलेला नाही.
अखेरच्या सामन्यात खेळणार
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झालेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाचव्या व अखेरच्या सामन्यात खेळणार असल्याचा निर्वाळा बीसीसीआयने दिला आहे. या सामन्यातील 15 व्या षटकात कोहली जखमी झाला होता. यानंतर तो मैदानाबाहेर गेला व उप कर्णधार रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले. दरम्यान कोहलीची दुखापत गंभीर नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.