नवी दिल्ली – महेंद्रसिंग धोनीनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीकडे आली. त्यानेही आपल्या कामगिरीबरोबरच संघाच्या कामगिरीतही सुधारणा घडवून आणली. त्याच्यावर आक्रमकतेचा शिक्का बसला मात्र संघाला एक आक्रमक कर्णधारच हवा होता, तो कोहलीच्या रूपाने मिळाला. कोहलीच्याच नेतृत्वामुळे आज संघाच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे, अशा शब्दात भारताचे माजी कसोटीपटू मदनलाल यांनी कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-20 मालिकेत विजेतेपद मिळाले, मात्र एकदिवसीय तसेच कसोटी मालिकेत अपयश आले. जरी दोन मालिका भारताने गमावल्या आसल्या तरी त्यासाठी कोहली संघाचे योग्य नेतृत्व करण्यात अपयशी ठरला असे बोलण्यात अर्थ नाही. काहीवेळा असे पराभव होतात, अखेर हा खेळ आहे, त्यात विजय पराभव होणारच.
सौरव गांगुली आक्रमक कर्णधार होता, त्यानंतर धोनीनेही संघाच्या विजयाचा आलेख उंचावला मात्र आता कोहली कर्णधार आहे आणि त्याच्या स्वभावात निसर्गतः असलेली आक्रमकता त्याच्या नेतृत्वातही दिसून येते. त्याचा आक्रमक स्वभाव संघाला मारक नव्हे तर तारक ठरतो हे कोणीच नाकारणार नाही. सध्याच्या क्रिकेटमधील बदल पाहता कोहलीसारख्या आक्रमक कर्णधाराचीच संघाला गरज आहे. गेल्या वर्षीपासून संघाने आत्ताचा न्यूझीलंड दौरा वगळता सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, असेही मदनलाल यांनी सांगितले.
धोनीकडून संघाचे नेतृत्व कोहलीकडे आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गतवर्षी झालेल्या पाच मालिका जिंकल्या. न्यूझीलंडविरुद्ध देखील टी-20 मालिकेत यश मिळविले. त्यानंतर एकदिवसीय व कसोटी मालिकेत संघ पराभूत झाला. मात्र या पराभवासाठी केवळ कोहलीलाच कसा दोष द्यायचा. संघात कोहली व्यतिरिक्त अन्य खेळाडू असतात मग त्यांची सुमार कामगिरी देखील या पराभवासाठी कारणीभूत ठरली आहे. संघाचा विजय झाला की कोणा एका खेळाडूमुळे आणि पराभव झाला की कर्णधारामुळे असे चित्र रंगविणे अयोग्य आहे.
कोहलीची आक्रमकता कमी झाली पाहिजे अशी अपेक्षा का केली जाते. पूर्वी भारतीय संघ कधीच आक्रमक नव्हता. कर्णधारही मैदानावर आक्रमकता दाखवत नव्हते मात्र गांगुलीचे आक्रमक नेतृत्व क्रिकेट चाहत्यांनी स्वीकारले मग कोहलीबाबतच त्यांचा दुजाभाव का, अशी विचारणाही मदनलाल यांनी केली.