ख्राईस्टचर्च – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यात सलग दुसऱ्या व्हाइटवॉशला सामोरे जावे लागले आहे. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 131 धावांचे आव्हान 7 गडी राखत पूर्ण केले. यामुळे एकदिवसीय मालिकेपाठोपाठ (3-0) कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड (2-0) पहावे लागले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला.
दरम्यान, या पराभवामुळे कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामने हरणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध अशाच पद्धतीने पराभवाला सामोरं जावे लागले होते. तब्बल 18 वर्षांनी भारतीय कर्णधारावर अशी नामुष्कीची वेळ ओढवली आहे.
सामना हरल्यानंतर विराट कोहली प्रचंड संतापलेला दिसला. त्याने म्हटले आहे की, टॉस जिंकणे किंवा पराभूत होणे यावर काही गोष्टी अवलंबून असतात. पण त्याबद्दल आपण तक्रार करू शकत नाही. नाणेफेक जिंकणे आपल्या गोलंदाजांना फायद्याचे ठरते, पण जेव्हा तुम्ही परदेशात खेळता आहात, त्यावेळी मात्र तुम्हाला या साऱ्या गोष्टी गृहित धरायला हव्यात. हा पराभव स्वीकारायलाच हवा. भविष्यात जर आम्हाला परदेशात जाऊन सामने जिंकायचे असतील तर सुधारणा करायला हवी. काहीही कारणे न देता चुका सुधारून पुढे जाणे हेच सध्या आमच्या हातात आहे.
“गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात भारताने खराब कामगिरी केली. आम्ही आमच्या योजनांची नीट अंमलबजावणी करू शकलो नाही. याउलट न्यूझीलंडने नीट नियोजनबद्ध खेळ करून सामना जिंकला. या दोन्ही गोष्टींमुळे भारताचा पराभव झाला. फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करता आले नाही. त्यांनी न्यूझीलंडवर दडपण आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण आमचे गोलंदाज दीर्घकाळ भेदक मारा करण्यात अपयशी ठरले. आमच्या गोलंदाजांनी उत्तमच गोलंदाजी केली. पहिल्या कसोटीतदेखील गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. पण जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करूनही त्याचा उपयोग होत नाही, तेव्हा तुम्ही निराश होता. तसेच काहीसे झाले आहे. त्यामुळे आता ज्या चुका झाल्या आहेत, त्या शोधून दुरुस्त करणे हेच आमचे काम असणार आहे.
– विराट कोहली, भारताचा कर्णधार