इंदूर – बांगलादेशविरूध्दच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजानी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा तिस-या दिवशीच एक डाव आणि १३० धावांनी पराभव केला. तसेच या विजयासह दोन कसोटींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा 10 वा डावाने विजय ठरला आहे, तर धोनीने कर्णधार म्हणून 9 सामन्यांमध्ये डावाने विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे अशी कामगिरी करणारा विराट हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला.
डावाने विजय मिळविण्याच्या भारतीय कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंग धोनीनंतर अजहरूद्दीन आणि सौरव गांगुलीचे नाव येते. अजहरूद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने ८ तर सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली ७ डावाने विजय मिळविले आहेत. सर्वाधिक डावाने विजयांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २२ विजय नोंदविले आहे.