-हेमंत देसाई
कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या चर्चात्मक कार्यक्रमात ते सामील झाले होते. या कार्यक्रमानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र दिसते तेवढे हे प्रकरण साधे नसून, या संदर्भात उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अंशू तिवारी यांनी पोलिसात तक्रार केली आहे आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या अटकेची मागणी केली आहे. सोशल मीडियावर काहीकाळ “अरेस्टसंबितपात्रा’ असा हॅशटॅग व्हायरल झाला. याबाबत ओडिशाप्रदेश युवक कॉंग्रेसनेही तक्रार दाखल केली.
या चर्चासत्राच्या कार्यक्रमात त्यागी हे कुंकुमतिलक लावून आले होते. बंगळुरूमधील दंगल हा चर्चेचा विषय होता. त्यावेळी बोलताना पात्रा यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली. यामुळे चर्चेचे वातावरण तप्त झाले आणि पात्रा यांच्या बेछूट वक्तव्यामुळे त्यागींसारखा अत्यंत सभ्य आणि संयमी नेता अस्वस्थ झाल्याचे छोट्या पडद्यावर दिसत होते. त्याचवेळी त्यांनी आपल्या छातीवर हातही ठेवला होता. खरे तर तेव्हाच त्यांना त्रास सुरू झाला होता. कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच त्यागी यांच्या छातीत कमालीचे दुखू लागले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना लगेचच मृत घोषित केले.
डॉक्टरांनीदेखील त्यांना मानसिक त्रास झाल्याचे सांगून, त्याचाच हा परिणाम असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे त्यागी यांच्या मृत्यूस पात्रा हेच जबाबदार असल्याचे त्यागी यांच्या कुटुंबियांनीही म्हटले आहे. त्यागी यांच्या मृत्यूनंतर, “विश्वास नहीं हो रहा है. कॉंग्रेस के प्रवक्ता, मेरे मित्र त्यागी हमारे साथ नहीं हैं,’ असे ट्विट पात्रा यांनी करून, स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या निमित्ताने टीव्ही चॅनेलवरील चर्चेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
संबित पात्रा हे अनेकदा कारण नसतानाही प्रत्येक विषय हिंदु-मुसलमानाच्या परिप्रेक्ष्यात नेऊन ठेवतात. विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांना देशद्रोही, गद्दार, भ्रष्टाचारी, पाकिस्तानवादी, असे ठरवतात. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची अक्कल काढणे आणि टवाळी करणे हा त्यांचा आवडता धंदा आहे. सोशल मीडियावरून वेगवेगळ्या पक्ष व नेत्यांची बदनामी करणे, त्यांना ट्रोल करणे हे उद्योग भाजपकडून कसे चालतात, याची माहिती आता सर्वांनाच झाली आहे.
भाजपतर्फे ही आघाडी सांभाळणारे अमित मालवीय हेसुद्धा अत्यंत विषारी पद्धतीने बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. भाजपचे आणखीन एक प्रवक्ते गौरव भाटिया हे समाजवादी पार्टीतून या पक्षात आले. आधी ते मुलायमसिंग यादव यांची वकिली करायचे आणि आता नरेंद्र मोदी व अमित शहा यांची बाजू ते लढवत असतात. ते पेशाने वकील असूनही, एका कार्यक्रमात ते दुसऱ्याच्या अंगावर धावून गेल्याचा प्रसंग घडल्याचेही सांगण्यात येते. संबित पात्रा असो की भाटिया, एका मासिकाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई अथवा एका वृत्तवाहिनीचे माजी संपादक निधी राझदान यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. पात्रा यांच्या विषारी वक्तव्यामुळे वैतागून निधी यांनी त्यांना एकदा रोखले. तेव्हा, मी आता या चर्चेतून निघून जाईन, अशी धमकी पात्रा यांनी दिली. त्यावेळी, अशा प्रकारची जहरी वक्तव्ये या कार्यक्रमात करता येणार नाहीत. तुम्हाला निघून जायचे असेल तर अवश्य जा, असे ठणकावून शेवटी निधीने त्यांना हाकलवूनच लावले होते.
पात्रा यांनी त्यागी यांच्यावर जी टीका केली, त्या कार्यक्रमाचा अँकर रोहित सरदाना यांनीही यापूर्वी वादग्रस्त ट्विट्स करून, गोंधळ उडवून दिला आहे. राफेल, चीन, राममंदिर, करोना असा कोणताही विषय असला, तरी त्याचे रूपांतर हिंदु-मुस्लीम, भारत-पाकिस्तान, देशभक्त-देशद्रोही असे करण्यात भाजपचे प्रवक्ते तरबेज आहेत. वास्तविक अनेक वर्षांपूर्वी स्व. अरुण जेटली, स्व. सुषमा स्वराज यांच्यासारखे सुसंस्कृत प्रवक्ते भाजपला लाभले होते. वाजपेयी-अडवाणी यांच्यापरंपरेत त्यांची जडणघडण झाली होती. अरुण शौरी, यशवंत सिन्हा, जसवंतसिंह हेदेखील भाजपमध्ये असताना पक्षाची बाजू संयतपणे मांडत असत. आज मात्र टीव्ही चर्चेचे रूपांतर रणभूमीत झाले असून, त्यामुळे टीआरपी वाढतो, असा चॅनलवाल्यांचा अनुभव आहे.
एका वृत्तवाहिनीचे मालक-संपादक अर्णव गोस्वामी यांनी पालघर येथे साधूंची हत्या झाल्यानंतर कमालीच्या आततायी स्वरूपात चर्चा नेऊन ठेवली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली, परंतु या प्रकरणातून ते सुटले. अलीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी संबोधण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर अर्णव यांनी त्यांचे पती शशी थरूर यांच्यावर सातत्याने चिखलफेक केली होती. त्यांची वृत्तवाहिनी तर भाजपचा माउथपीस बनला आहे. हिंदीमधील अमिष देवगण हा अँकर तर गरिबांचा अर्णव गोस्वामी म्हणून ओळखला जातो. श्वेता सिंग, अंजना ओम कश्यप असे अनेक अँकर्स ही या मीडियातील आघाडीची नावे आहेत. अनुराधा प्रसाद ह्या एका वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादक असून, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या त्या भगिनी होत. कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्या त्या पत्नी. परंतु या चॅनेलवरून अहोरात्र विशिष्ट पक्षाचा प्रचार सुरू असतो.
आणखी एका वृत्तवाहिनीवर जातीय द्वेष पसरवण्याच्या आरोपावरून झारखंड सरकारने त्यावर कारवाई केली होती. फक्त भाजपचेच प्रवक्ते नव्हे, तर कॉंग्रेस असो, समाजवादी पार्टी असो वा अन्य पक्षाचे काही प्रवक्ते, ते अनेकदा पातळी सोडून बोलत असतात. चर्चेच्या कार्यक्रमातून विषयाच्या वेगवेगळ्या बाजू लोकांसमोर याव्यात आणि लोकांचे प्रबोधन व्हावे, अशी अपेक्षा असते. तसेच अँकर्सनी नेमस्तपणे व तटस्थपणे आपले काम बजावले पाहिजे. प्रत्यक्षात विषयाची निवड, त्याचे शीर्षकसहभागी व्यक्तींची निवड यामधूनच अनेक चर्चांचे एकांगी स्वरूप स्पष्ट होते. आक्रस्ताळी पद्धतीने द्वेषमूलक भाषा वापरत, व्यक्तिगत हल्ले चढवत, चर्चा भरकटवली जाते. अशा चर्चांमुळे समाजात फक्त तणाव वाढत असेल आणि हाती काहीच लागत नसेल, तर उद्या प्रेक्षकच या चर्चांवर बहिष्कार टाकतील.