मुंबई : दिल्ली हिंसाचाराबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून दिल्ली पेटली आहे.
केंद्रातील सत्ताधारी पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकता आल्या नाहीत म्हणून त्यांनी जातीयवादाचा प्रसार करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दिल्ली निवडणुकांच्या वेळी भाजप नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून समाजात तणाव पसरवण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर कॉंग्रेसनेही दिल्लीतील हिंसाचाराबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पोलिसांवर एकतर्फी कारवाईचा आरोप केला असून, सर्वोच्च न्यायालयाला संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशाची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान दिल्ली हिंसाचारात मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. हिंसाचारात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटीने) तपास सुरु केला आहे.