नवी दिल्ली – प. बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यात केंद्रीय दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात पाच जण मरण पावले. ही घटना सीतालकुची विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्र क्रमांक 126 वर घडली. या केंद्रावरील मतदान स्थगित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल विशेष निरीक्षक आणि राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक् तांनी पाच वाजेपर्यंत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
स्थानिकांनी हल्ला करून शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करून केंद्रीय पथकाने या जमावावर गोळीबार केला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. सीतालकुची भागात मतदान सुरू असताना हा प्रकार घडल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
सीतालकुचीमध्ये हिंसाचाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला.
केंद्रीय औद्योगिकसुरक्षा दलाच्या जवानाने मतदान केंद्राजवळील जमावावर केलेल्या गोळीबारात चार जण मरण पावले. तर पठाणतुली भागात अज्ञात व्यक्तीने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या एका तरुणाला मतदान केंद्राबाहेर खेचून गोळ्या घातल्या, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय दलांनी निष्पाप नागरिकांवर का गोळीबार केला याचा जबाब अमित शहा यांनी द्यावा. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतक्या लोकांच्या मृत्यूनंतरही ते (निवडणूक आयोग) म्हणत आहेत स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्यात आला. त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मतदानासाठी रांगेत उभारलेल्या लोकांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी गोळीबार केला, या दलांच्या अशा कार्यपद्धतीचा आम्हाला खूप आधीपासून अनुभव आहे. भाजपाने जनादेश गमावला आहे. त्यामुळे ते आता नागरिकांची हत्या करत आहेत. हा सर्व प्रकार अमित शहा यांनी रचलेल्या कटाचा भाग आहे. तरीही मी जनतेला शांत राहण्याचे आवाहन करत आहे आणि शांततेने मतदान करा. मृतांचा बदला घेण्यासाठी त्यांना पराभूत करा, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात कुचबिहार जिल्ह्यातील माथाभंगा भागात केंद्रीय दलांनी गोळ्या घालून पाच जणांची हत्या केली. त्याचा जाब निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसने केली आहे. ही निवडणूक सुरू झाल्यापासून 17 ते 18 जणांची हत्या करण्यात आली. त्या एक डझन कार्यकर्ते आमच्या पक्षाचे आहेत. सध्या प्रशासनाचा ताबा आमच्याकडे नाही तर निवडणूक आयोगाकडे आहे, याकडे ममता बॅनर्जी यांनी लक्ष वेधले.