कोलकाता – प. बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात हिंसाचार झालेल्या सितालकुचीमध्ये मरण पावलेल्यांना पाठीमागून सुमारे 14 मीटरवरून गोळ्या मारण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार जण मरण पावले होते.
याचा ऍटॉप्सी रिपोर्टनुसार, मरण पावलेल्या चारही जणांना त्यांच्या शरीराच्या वरील भागात गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे जवानांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबाराच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
थंड डोक्याने केलेल्या हत्या
या तर थंड डोक्याने केलेल्या हत्या आहेत, असा आरोप करून तृणमूल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओब्रॅअन म्हणाले, तीन जणांच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. तर एकाच्या पाठीत गोळी घुसली होती. मरण पावलेल्यांना जवळून गोळ्या घातल्याचे ऍटॉप्सी रिपोर्टवरून स्पष्ट होत आहे. एक जण पळून जात असताना सुमारे 10 मीटर अंतरावरून त्याला गोळी घालण्यात आली. तर दुसऱ्याला रायफलमधून डोक्यात गोळी घालण्यात आली. तर तिसऱ्याला जवळून छातीत गोळी घालण्यात आल्याचे या रिपोर्टवरून स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले.