इम्फाळ – मणिपूरमध्ये आता शातंता आहे, असा दावा मुख्यमंत्री नोंगथोंबाम बीरेन सिंह यांनी रविवारी केला आणि सोमवारी दुपारी पुन्हा मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला. इम्फाळ येथील दोन समुदायांमध्ये आज वाद झाल्यानंतर हल्लेखोरांनी रिकाम्या घरांची तोडफोड करत घरांना आग लावली. तसेच छावणीत झोपलेल्या नागरिकांवर हल्ला केला.
इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. येथील न्यू चेकोन भागात मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये सोमवारी दुपारी वाद झाला. हा वाद स्थानिक बाजारपेठेत जागेवरुन झाला. यानंतर जमावाकडून जाळपोळ सुरू करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या लष्कराच्या जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे काही लोक किरकोळ जखमी झाले.
या घटनेचा स्थानिकांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. या घटनेनंतर इंफाळ पूर्व जिल्ह्यात संचारबंदी कडक करण्यात आली. तसेच या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. कुकी ग्रामस्थांना राखीव वनजमिनीतून बेदखल करण्यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे याआधीही अनेक चकमकी झाल्या.
येथील 64 टक्के लोकसंख्या मेईतेई समुदायाची आहे. राज्याच्या 10 टक्के क्षेत्रावर त्यांचा कब्जा आहे. अधिसूचित डोंगराळ भागात बिगर आदिवासींना जमीन खरेदी करण्याची परवानगी नाही. त्यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश केल्यास ते डोंगराळ भागात जमीन खरेदी करू शकतील. त्यामुळे आदिवासींमध्ये नाराजी आहे.