बगदाद : इइराकमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सशस्त्र निदर्शनांदरम्यान आतापर्यंत 200 जण ठार झाले आहेत. ही हिंसक निदर्शने आटोक्यात आणण्यासाठी इराकी सुरक्षा दलांना शुक्रवारपासून यश येऊ लागले आहे. शनिवारी बगदाद आणि दक्षिणेस इराकी सुरक्षा दलांनी निदर्शने रोखली. नव्याने सुरू झालेल्या निदर्शनांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी संसदीय अधिवेशन निष्कर्श काढण्यात अयशस्वी झाले. परिणामी हे अधिवेशनच रद्द करण्यात आले.
1 ऑक्टोबर रोजी सर्वप्रथम सरकारविरोधी मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनामुळे बगदादमध्ये सुमारे 200 लोक मरण पावले आहेत आणि हजारो जखमी झाले आहेत. त्यातील जवळजवळ एक चतुर्थांश म्हणजे 42 जण एकट्या शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात मरण पावले. अर्ध सैनिक दलांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी गोळीबार आणि अश्रुधुराच्या गॅसचा मारा केला.
दक्षिणेकडील अनेक शहरांतील शक्तिशाली हशेद अल-शाबी गटातील सरकारी इमारती किंवा कार्यालयांची जाळपोळ करण्यात आली. शनिवारी तेथील कित्येक शहरांमध्ये तणाव कायम होता. सुरक्षा दलांनी रस्ते बंद केले आणि कडक संचारबंदी लागू केली.
बेरोजगारीचे प्रचंड प्रमाण आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे 1 ऑक्टोबरला व्यापक निदर्शनांचे वातावरण निर्माण झाले होते आणि सरकारने सुधारणांचा प्रस्ताव देऊन जनतेचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर हे निषेधाचे वातावरण तापतच गेले.