मुंबई, – नवनीत राणा आणि रवि राणा यांना जामीन मंजुर करताना प्रचलीत हनुमान चालीसाच्या वादावर प्रसार माध्यमांच्या पुढे काहीही न बोलण्याची अट कोर्टाने टाकली होती. पण आज प्रसार माध्यमांपुढे बोलताना त्यांना या अटीची आठवण राहिली नाही. त्यांनी पुन्हा तोच विषय उपस्थित करीत पुन्हा प्रक्षोभक विधाने केल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने कोर्टात जाण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.
या संबंधात विशेष सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. सरकारतर्फे आता राणा दाम्पत्यावर कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल केली जाणार आहे. हनुमान चालीसा किंवा तद्अनुषंगीक बाबींवर प्रसार माध्यमांपुढे बोलल्यास तुमचा जामीन रद्द केला जाईल असे कोर्टाने या दाम्पत्याला स्पष्ट बजावले होते. त्यामुळे त्यांच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्सची व्हिडीओ टेप कोर्टापुढे सादर करून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हनुमान चालीसा म्हटल्याने जर आपल्याला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली तरी आपण ती भोगायला तयार आहोत असे वक्तव्य नवनीत राणा यांनी आज प्रसार माध्यमांपुढे बोलताना केले. तसेच नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मतदार संघातून आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवण्याचेही आव्हान दिले आहे.