मुंबई : शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शाब्दिक युद्ध रोज नव्याने समोर येत आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. “उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचे, शिवसेना संपवायची, शिवसेना नाव पुसून टाकायचं,” असा यांचा डाव असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.
दहिसरमध्ये शिवसेना नागरी सत्कार समारंभात बोलत असताना विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. “भ**** करणाऱ्या ४० गद्दारांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा जो धंदा आहे, तो उधळून लावून ही शिवसेना केवळ बाळासाहेबांची, उद्दव ठाकरेंची आहे, तुमच्या बापजाद्याची कधी होऊ शकत नाही हे दाखवून देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल,” असे विनायक राऊत म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून येणारा वेदान्त गुजरातला पाठवण्याचं पाप या शिंदे सरकराने केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार, अभ्यासू व्यक्तीवर सध्या दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. या अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागत आहे,” अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
“एकनाथ शिंदेंना आता मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेल्याची आठवण झाली. त्यांना आता मराठी माणूस आठवत आहे. तोदेखील गुवाहाटी, सूरतला जाऊन आठवत आहे,” असा टोला विनायक राऊत यांनी लगावला. किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली, असेही विनायक राऊत म्हणाले आहेत.