कणकवली : मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा कमालीचा यशस्वी झाला असून ही बाब न पचल्यानेच राणे कोकणच्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम करत आहेत. मात्र राणेंनी कितीही आडकाठी आणली तरी कोकणचा विकास आता थांबणार नाही. कोकणला भरभरून मिळत असल्यानेच नारायण राणे यांचा जळफळाट होत आहे, असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगाविला.
मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर राणे यांनी टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आले होते. केवळ घोषणांपलीकडे मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काहीही दिले नाही, असा आरोप राणे यांनी काल केला होता. चिपी विमानतळावरूनही राणेंनी मुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टीका केली होती. या टीकेला आज विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी राणेंचे सर्व आरोप फेटाळून लावले व राणेंमुळेच कोकणचा विकास कसा रखडला असा प्रतिआरोप केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व प्रकल्प वेळेतच मार्गी लागणार आहेत. चिपी विमानतळ आणि सी-वर्ल्ड हे प्रकल्प रखडण्यास नारायण राणेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप राऊत यांनी केला.