रत्नागिरी – अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरीत मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून, तालुक्यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या संभाव्या धोक्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आज पहाटेपासून राजापूर रत्नागिरी तालुक्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून काल सायंकाळापासून गुहागर आणि दापोलीतही संचारबंदीची अंमलबजावणी सुरु आहे. किनारपट्टी भागातील पाच तालुक्यांना अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात वादळाचे पडसाद उमटले असून, पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटला आहे. त्यामुळे रात्री 2 पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज बंद करण्यात आली आहे. तर किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस पडतो आहे.
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळादरम्यान वाहणारे वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विविध रुग्णालयांतील रुग्णांचे सुरक्षितपणे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील कोविड रुग्णालयातून रुग्णांना हलवण्यात आले आहे. तसेच दहिसर आणि मुलुंडच्या कोविड रुग्णालयातूनही रुग्णांना सुरक्षित स्थानी हलविण्यात आलं.
बिकेसी , दहिसर आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर केले असून त्यात वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील 243, दहिसर कोविड केंद्रातील 183 आणि मुलूंड कोविड केंद्रातील 154 रुग्णांचा समावेश
मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसत असून, अनेक भागात पावसाच्या सरी तर अनेक भागात सोसाट्याचा वारा सुटला आहे. मुलुंडमध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा आपत्कालीन विभागानेही हाय अलर्टचा संदेश दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात काल रात्री पासून ढगाळ वातावरण असून जोरदार वारे सुटले आहेत.