नवी दिल्ली, – अमेरिकेची संरक्षण संस्था पेंटॅगॉनने प्रसिद्धकेलेल्या एका अहवालात अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेषेलगत चीनने एक मोठे गाव उभारले असल्याचे दाखवण्यात आले आहे. या अहवालाची दखल भारतीय संरक्षण दलांकडून घेण्यात आली असून हा अहवाल मागे घेण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.
हे गाव चिनी लष्कराचे नियंत्रण असलेल्या भूमीवर किमान 6 दशकांपासून असल्याचे भारतीय संरक्षण दलांकडून सांगण्यात आले आहे. 1959 मध्ये आसाम रायफल्सचे ठाणे हटवून चिनी लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीने ताब्यात घेतलेल्या जागेवर हे गाव उभे करण्यात आले असल्याचेही म्हटले आहे.
वादग्रस्त सीमेलगत सुबानसिरी जिल्ह्यातील हे गाव चीनच्या ताब्यात असलेल्या भूमीवर आहे. मात्र 1959 मध्ये लोंग्लू नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेनंतर चीनने ही भूमी ताब्यात घेतली होती. या भागात चीनचे ठाणे अनेक वर्षांपासून आहे. या भागात चीनने खूप वेगवेगळी बांधकामेही केली आहेत. मात्र ही बांधकामे एका रात्रीत उभी केलेली नाहीत, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीनने 100 घरांचे गाव नियंत्रण रेषेच्या पूर्वेला तिबेट स्वायत्त भूभाग आणि अरुणाचल प्रदेशादरम्यानच्या वादग्रस्त भूभागावर उभारले गेले असल्याचे म्हटले आहे. “एलएसी’ नजीकच्या भागावरील आपला हक्क कायम दाखवण्यासाठी चीनकडून सीमेजवळील भागात सातत्याने हालचाली केल्या जात असतात.
सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी बारताकडून उच्चस्तरिय पातळीवर सातत्याने चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवली असली तरी चीनकडून या हालचाली कायम असतात, असेही या अहवालात म्हटले आहे. चीनच्या ताब्यातील तिबेट स्वायत्त प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशादरम्यानच्या भागावर 2020 दरम्यान हे गाव उबे करण्यात आले असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर भारताने नियंत्रण रेषेजवळ आपले सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात केले आहे. तर अलिकडील काळात चीनकडूनही सीमाभागात हालचाली वाढल्या आहेत.