सीईओ आयुष प्रसाद यांची माहिती; सर्व गावांत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प
पुणे – जिल्ह्यातील गावांमध्ये शहराप्रमाणेच कचरा समस्या भेडसावत आहे. याकरिता जिल्हा परिषदेमार्फत सर्व गावांत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करून “स्वच्छ व सुंदर गाव’ करून देशात एक मॉडेल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या सहभाग आणि समन्वयातून गावनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापनाबाबत हिंजवडी, माण व म्हाळुंगे या आयटी पार्क परिसरातील ग्रामपंचायतींची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी सीईओ यांनी संवाद साधला. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे आदी उपस्थित होते.
प्रसाद म्हणाले, गावातील कचरा व्यवस्थापनाबरोबरच गावांचे सौंदर्यीकरण करावयाचे आहे. यासाठी गावस्तरावर कचरा संकलन, त्याचे व्यवस्थापन, जिथे जागा नाही त्या गावासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे म्हणाले, हिंजवडी एमआयडीसीकडून हिंजवडी, माण, म्हाळुंगे व इतर गावांच्या कचरा प्रकल्पाकरिता पाच एकर जागा जिल्हा परिषदेस आरक्षित करून दिली आहे. उपलब्ध जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता नियोजन करून प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.