मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुर येथील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी भेटून नुकसानीचा आढावा घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी धीर सोडू नये. नुकसान-भरपाई देण्यास शासन खंबीर असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हंटले आहे.
मुखमंत्र्यांनी सोलापुरात पोहचल्यावर गावच्या वेशीवर थांबून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांची निवेदनेही त्यांनी स्वीकारली. अतिवृष्टीने व पुरामुळे झालेले नुकसान प्रचंड मोठे असून जगणेच अवघड झाले आहे, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगितल्या.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर असून त्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळणारच आहे. परंतु या संकटाशी सामना करताना ग्रामस्थांनी धीर सोडू नये, जीवाचे बरेवाईट करून घेऊ नये. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून 11 धनादेशांचे वाटप केले आहे. पडझड झालेल्या प्रत्येक घराला 95 हजारांची मदत देण्यात आली आहे.
Maharashtra: Chief Minister Uddhav Thackeray visits flood-affected areas of Sholapur district and reviews the situation while meeting the local residents. pic.twitter.com/CrV43RDOUv
— ANI (@ANI) October 19, 2020
दरम्यान, मुंबईहून विमानाने सोलापुरात दाखल झाल्यानंतर ठाकरे हे थेट अक्कलकोटकडे रवाना झाले. तेथील बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. मात्र, ग्रामस्थांनी पुलावरून नुकसानीची पाहणी न करता मुख्यमंत्र्यांनी थेट गावात, बांधावर येऊन पाहणी करावी, अशी मागणी केली होती.