दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आग्रही : नाणे-नाणोली बंधाऱ्याची दुरवस्था
वडगाव मावळ – माऊलीनगर (कामशेत) जवळील नाणे-नाणोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या (केटी) पाटबंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. दरवर्षी पाणी गळतीच्या नावाखाली तात्पुरत्या डागडुजीसाठी शासनाचा निधी वापरला जातो. याच बंधाऱ्यावरून नवीन उकसान ग्रामस्थांची ये-जा सुरू असते.
पावसाळ्यात हा बंधारा अनेकदा पाण्याखाली जात असल्याने त्यांचा संपर्क तुटतो. शासकीय पातळीवर वर्षेनुवर्षे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र दुरुस्तीसाठी येणारे “शुल्ककाष्ठ’ संपत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली.
नाणे-नाणोली कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची उभारणी सन 1991-92 मध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी करण्यात आली. या बंधाऱ्याचे पाणी अडवण्याचे दगडी गाळे मोठ्या प्रमाणात तुटलेले असून, लोखंडी गेट पूर्णतः गंजलेले आहे. काही गेट चोरीला गेल्याची दिसत आहे. या बंधाऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या, पोती, थर्माकोल, जीर्ण झालेले कपडे व जंगली गवत वाढलेले असल्याने परिसरात दुर्गंधी परसली आहे.
या बंधाऱ्यावरून अनेक शेतकऱ्यांना कृषिपंपांचे वीज मीटर देण्यात आले असून कामशेत, खामशेत व माऊलीनगर परिसरातील नागरिकांना या बंधाऱ्यातून दुषित पाणीपुरवठा केला जात आहे. या बंधाऱ्याची देखभाल करण्यासाठी पाटबंधारे विभागाने चौकीदारासाठी सुसज्य इमारत बांधली खरी मात्र त्या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून चौकीदार व अधिकारी फिरकले नाहीत. त्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीमध्ये जंगली झाडांचा व गवताचा विळखा आहे. परिसरात घुशीने उकीर काढले आहेत. मोकाट कुत्री, उंदीर, साप, विंचू व अन्य किटकांचा वावर आहे.
या बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने बंधाऱ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होत नाही, गेल्या वर्षी बंधाऱ्याची दुरुस्ती न करता, शासनाच्या निधीतून सिमेंटच्या पोतीत माती भरून बंधाऱ्याच्या बाजूला मातीचा बंधारा घातला. हे काम ठेकेदराकरवी न करता, शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जाते. या बंधाऱ्याच्या गाळ्याची व गेटची किरकोळ स्वरूपात डागडुजी करून बिल काढले जात असल्याची
ओरड आहे.
याशिवाय या बंधाऱ्यावरून नाणे, नवीन उकसान, साई, वाउंड, घोणशेत परिसरातील विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यावसायिक, शेतकरी, ग्रामस्थ मावळ तालुक्याची बाजारपेठ असलेल्या कामशेत शहरात ये-जा करतात. पावसाळ्यात अनेकदा या बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा
संपर्क तुटतो.
या बंधाऱ्यात दुषित सांडपाणी सोडले जात असून, पाटबंधारे विभाग डोळेझाक करीत आहे. बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी कमी पडल्याने उत्पादनात घट होते. वारंवार धरणातून पाणी सोडल्याने जलसाठा कमी होत असून, पाण्याचा अपव्यय होत आहे. या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करावा तसेच चौकीदाराच्या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवक गणेश काकडे, अतुल वायकर, राजू लालगुडे, दत्तोबा आंद्रे, रमेश भूरूक, मोहित कदम, किरण यादव, कल्पना भेगडे आदींनी केली.
पाठपुराव्याचा सिलसिला सुरूच…
वडिवळे पाटबंधारे विभाग शाखा अभियंता मनोहर खाडे म्हणाले की, या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा सुरू, मंजुरी मिळाल्यास त्वरित काम केले जाईल. वडिवळे पाटबंधारे शाखा अभियंता एम. एम. खाडे यांनीही शासकीय निधीच्या कमतरेचा पाढा वाचत बंधाऱ्याच्या दुरवस्था झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, या बंधाऱ्यात पूर्णाक्षमतेने पाणीसाठा होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविला आहे. निधी उपलब्ध झाल्यावर त्वरित काम पूर्ण केले जाईल.