डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायत हद्दीत चार गावांसाठी मेखळी- सोनगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. जवळपास वीस-पंचवीस वर्षापासून ही योजना कार्यान्वित आहे. या योजनेचा तलाव हाकेच्या अंतरावर असूनही झारगडवाडी गावातील सोलनकर वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या नागरिकांची झाली होती पिण्याचे पाणी मिळावे यासाठी येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केलेला होता मात्र त्यांना यश येत नव्हते अखेर सरपंच पद्मनाथ निकम व सत्ताधारी पॅनल प्रमुख नारायण कोळेकर, राजेंद्र बोरकर, दयाबापू महाडिक, पोपट निकम, सतीश ( मेजर ) कुलाळ आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरख बोरकर, उपसरपंच सोनाली रामभाऊ करे, माझी उपसरपंच सोनाली राहुल चव्हाण यांनी नागरिकांचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला.
या योजनेतून शेजारी असलेल्या चार गावांना नळ पाणीपुरवठाद्वारे केला जात आहे, परंतु या योजनेच्या हाकेच्या अंतरावर ५०० लोकसंख्या असलेल्या वस्तीवर अनेक वर्षापासून वंचित राहावे लागले ही खूप मोठी शोकांतिका होती. या वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी भटकंती करावी लागत होती. या वस्तीवरील ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे पाण्यासाठी वारंवार मागणी केली होती. अनेक ग्रामसभेत त्या ग्रामस्थांनी आपले विषय मांडले, तरीही पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. मात्र बारामतीचे गटविकास अधिकारी अनिल बागल, पंचायत समितीचे पाणीपुरवठयाचे उपअभियंता ए.एम. आडे, कनिष्ठ अभियंता अभिजीत कोकरे, अजित कारंडे, ग्रामविकास अधिकारी शहानूर शेख यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच पॅनल प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणाऱ्या नागरिकांना नळ पाणीपुरवठा करणे शक्य झाले असे सरपंच पद्मनात निकम यांनी सांगितले.
कोट – ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार मागणी करत होतो. परंतु प्रश्न मार्गी लागत नव्हता. परंतु विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि पॅनल प्रमुख यांनी आमचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला, अशा शब्दांत ग्रामस्थ राजेंद्र कालगावकर, अमोल सोलनकर, तुकाराम करे, नितीन सोलनकर, सागर सोलनकर, अशोक करे, दादा करे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.