मांडवगण फराटा – ग्राम सुरक्षा यंत्रणेचा आता चोरी व दरोड्या टाकणाऱ्यांवर वॉच राहणार असून ही यंत्रणा चोरट्यांना सळो की पळो करून सोडणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यात या यंत्रणेची मदत होणार आहे. या यंत्रणेची माहिती गावाला एका क्लिकवर मिळणार आहे.
21 व्या शतकातील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून मोबाइलचा उपयोग केला जातो. याच मोबाइलचा वापर करून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये गावात असणाऱ्या प्रत्येक घरातील प्रत्येक मोबाइल नंबर नोंदवून आपत्कालीन परिस्थितीत एकाच वेळेस जवळपास सर्वच क्रमांकांवर संपर्क करण्याची यंत्रणा राबविली जात आहे. त्यामुळे संकटात असणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यास याचा वापर प्रभावीपणे होत असल्याची माहिती या संकल्पनेचे संचालक डि.के गोरडे यांनी दिली.
गावात चोरी झाली, लहान मुले हरवली, वाहन चोरीला गेले, अपघात झाला, वन्यप्राण्यांनी हल्ला केला, पुर आला, ग्रामसभा अशा कोणत्याही आपत्तीच्या वेळी केवळ (18002703600) या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली असता परिसरातील सगळे लोक एकावेळी मदतीला येऊ शकतात.
आपत्ती तसेच दुर्घटनेच्यावेळी जवळच्या व्यक्तींना तातडीने संदेश मिळावा, यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेने देण्यात आलेल्या टोल फ्री नंबरवर फोन केल्यास त्याचा आवाज फोनद्वारे परिसरातील यंत्रणेला नोंदणी केलेल्या हजारो नागरिकांना त्वरित मोबाइलवर ऐकू जातो. नागरिकांना घटना घडत असतानाच तिची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे सहज शक्य होते.
फेक कॉल टाळले जातात
गंमत म्हणूनही ग्रामसुरक्षा यंत्रणेवर कॉल येण्याची शक्यता असते. त्याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे कॉल केला जातो. त्यावेळी जे शब्द वापरले जातात. त्यानुसार ते कॉल सत्य कि असत्य हे पडताळूनच काल पूर्ण होतो. कॉल करणाऱ्याने स्वतःचे नाव, पत्ता, गाव आणि घडलेली घटना वा द्यावयाचा संदेश 25 सेकंदात पूर्ण झाला पाहिजे.
चोरट्यांना पकडण्यात यश
महाराष्ट्रात ग्राम सुरक्षा यंत्रणा 700 गावे वापरत असून दोनशे गावांमध्ये या यंत्रणेची प्रक्रियेचे काम सुरू आहे. तब्बल सतरा हजार घटना या यंत्रणेने हाताळल्या असून यामध्ये चोरीच्या अडीचशे घटनांमध्ये चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. मानवी देह व संपत्ती घटनांमध्ये, अपघात झालेल्या व्यक्तींना या यंत्रणेमुळे मदत मिळालेली आहे. 2019 वर्षी आलेल्या पूरस्थितीत नाशिक जिल्ह्यात या ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर झाला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या यंत्रणेत सहभाग घेतला तर चोरीच्या व अन्य घटना मोठ्या प्रमाणात टाळता येणे शक्य होईल.
– डी. के. गोर्डे, संचालक ग्रामसुरक्षा यंत्रणा
ग्रामसुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात हिवरे बाजार गावाला फायदा झाला असून गेल्या 2 वर्षांपासून चोरी व अन्य घटनांत नुकसानीचे प्रमाण कमी आहे. सर्व ग्रामपंचायतींनी या यंत्रणेत सहभागी व्हावे.
– पोपटराव पवार, सरपंच, आदर्श हिवरे बाजार
ग्रामसुरक्षेचा यंत्रणेचा नागरिकांना फायदा होत असून घटना घडल्यानंतर कॉल येत असल्यामुळे हानी टाळणे शक्य होत आहे.
– तात्याबा खांडेकर, ग्रामस्थ, कुरुळी