नवी दिल्ली : अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनच्या अहवालात अरुणाचल प्रदेशजवळ चीनने गाव वसवल्याच्या दाव्याची खरी माहिती समोर आली आहे. संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, अरुणाचल सेक्टरमधील एलएसीजवळ चीनने बांधलेल्या ज्या गावाचा पेंटागॉनच्या अहवालात उल्लेख केलेले आहे ते आधीपासूनच चीनच्या ताब्यात असलेल्या भागात आहे.
– 1959 पासून चीनच्या ताब्यात आहे हा भाग
1959 मध्ये ज्या भागात चिनी सैन्याने ताबा मिळवला होता त्या भागात हे गाव चीनने वसवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 1959 मध्ये चिनी सैन्याने अरूणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात एका कारवाईत आसाम रायफल्सच्या चौकीवर हल्ला करून त्याजागेवर ताबा मिळवला होता. याला लाँगजू घटना म्हणून ओळखले जाते. त्यानंतरच चीनने या भागात गाव वसवले आहे.
– गाव अचानक निर्माण झालेले नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील वादग्रस्त सीमेवरील गाव चीनच्या ताब्यात असलेल्या भागात आहे. त्या भागात त्यांनी बऱ्याच काळापासून लष्कराची चौकी बांधली आहे. या गावाचे बांधकाम अचानक झालेले नाही. सुमारे सहा दशकांपूर्वी चीनच्या ताब्यात असलेल्या भागात हे गाव चीनने वसवले आहे.