मुंबई : थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाने विलासराव देशमुख अभय योजना जाहीर केली असून थकीत बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम सहा महिन्याचे हप्ते करुन भरल्यास थकबाकीवरील सर्व व्याज आणि दंड माफ करण्यात येईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.
मेहकर (जि.बुलढाणा) तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरण कंपनीने थकबाकी न भरल्यामुळे घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या संदर्भाने सदस्य संजय रायमुलकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुधारित वितरण क्षेत्र योजने (RDSS)च्या माध्यमातून राज्यात 1.66 कोटी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. मेहकरच्या ग्रामीण भागातील 114 घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकी न भरल्याने खंडित करण्यात आला होता. या खंडीत वीजपुरवठ्याची पुनर्जोडणी करण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना 2022 जाहीर केली असून या योजनेचा लाभ थकबाकीदारांना घेता येईल असे सांगून वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही अनधिकृत जोडण्या केल्याचे आढळून आल्यावर संबंधित उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरु असून अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.