मुंबई – आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये गोळा केले. मात्र ते सरकार जमा न करता स्वत: हडप केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. त्यानंतर सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलिसांत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आली. त्यामुळे सोमय्या यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका माजी सैनिकाने हा गुन्हा दाखल केला हे विशेष.
सोमय्या यांच्यावर बुधवारी सायंकाळी कलम 420 अन्वये म्हणजेच फसवणुकीच्या गुन्ह्याखाली किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा नील यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. माजी सैनिक बबन भोसले यांनी पोलिसांत फिर्याद दिली. ट्रॉम्बे पोलीस स्थानकामध्ये एफआयआर दाखल करुन घेतली.
सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी बुधवारी केली. किरीट सोमय्या विक्रांत वाचवा असे टी शर्ट घालून फिरत असताना लाखो, करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. याशिवाय अनेक कंपन्यांकडून त्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केले. ही रक्कम 57 ते 58 कोटी होती अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
त्यावेळी किरीट सोमय्या यांच्या मुलाखतीत या सरकारला देशभक्ती नाही असा आरोप केला होता. 200 कोटी गोळा करून ते राजभवनात जमा करु असे त्यांनी सांगितले होते. आरटीआय कार्यकर्त्याने राज्यपालांना 2013, 2014, 2015 विक्रांतसाठी जे पैसे गोळा केले होते ते जमा झालेत का? अशी विचारणा केली. यावर राज्यपाल कार्यालयाने असे कोणतेही पैसे जमा करण्यात आलेले नाहीत असे उत्तर देण्यात आले. देशाच्या सुरक्षेशी, राष्ट्रीय भानवेशी केलेली ही फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला होता.
हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी केलीच पाहिजे, पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपाची पदाधिकारी असणारी ईडी यांनी चौकशी करावी. त्यांना काही सापडत नसेल तर मी मदत करेन, असे आव्हानही राऊत यांनी दिले होते.
किरीट सोमय्या म्हणाले की, हा 18 वा आरोप आहे, 17 आरोप बोगस निघाले. उद्धव ठाकरे पण काही करू शकले नाहीत. हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने पण थोबाडीत दिली. मी तर पहिल्यापासून सांगत आहे की मी, नील सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी काही घोटाळा केला असेल तर उद्वव ठाकरेंकडे कागदपत्रे द्या, तपास करा आणि शिक्षा द्या.