नगर – अल्पावधीतच पक्षावर पकड मजबुत करीत पक्षांतर्गत प्रखर विरोधावरही मात करून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची माळ गळ्यात पाडली. आजच्या शपथविधी सोहळ्यात विखे पाटील यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याचा मान देखील प्रथम क्रमांकाचा मिळाल्याने त्यांनी पक्षातील आपले वर्चस्व या निमित्त्याने सिद्ध केले आहे. राजकारणातील ज्येष्ठता, अनेक वेळा मंत्री, विरोधी पक्ष नेता आणि विरोधकांवर मात करण्याची त्यांची कार्यपद्धती याचा विचार करून भाजपने विखेंना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी दिली.
अर्थात विखे कोणत्याही पक्षात असो त्यांना मंत्रीपद मिळणार या काही शंका नाही. यापूर्वी शिवसेना- भाजप युती सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये आल्यानंतरही मंत्रीपद मिळाले. आताही शिंदे- फडणवीस सरकारमध्ये पहिल्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधीत त्यांना पहिल्या क्रमांकाने मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे राज्यात राजकारणात विखेंचा नेहमीच वरचष्मा राहिल्याचे पाहिला मिळाले. नगर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी विखेंना मंत्रीपद मिळू नये यासाठी अनेक प्रयत्न केले.
त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींना साकडे देखील घालण्यात आले. मात्र त्यावर मात करून विखेंनी मंत्रीपद मिळविले. जिल्ह्यात मंत्रीपदाची संधी आमदार प्रा. राम शिंदे यांना मिळणार असे वाटत होते. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक. विखेंना मंत्रीपद मिळणार हे निश्चित होते. तसेच प्रा. शिंदे यांचीही मंत्रीपदी वर्णी लागणार हे देखील निश्चित होते. मात्र पहिल्या टप्प्यात विखेंना संधी मिळाली. आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रा. आ. शिंदे यांना संधी मिळणार का असा प्रश्न आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाढते वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टीने विखेंना मंत्रीपदाची संधी देण्यात आल्याचे दिसत आहे.
मंत्रीपदी राम शिंदे की राधाकृष्ण विखे याबद्दल उत्सुकता होती. मात्र या स्पर्धेत मूळ भाजपचे असलेल्या राम शिंदे यांच्यावर कॉंग्रेसमधून आलेल्या विखे यांनी मात केली.काही दिवसांपूर्वी भाजपमधील पराभूत आमदारांच्या शिष्टमंडळाने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विखे यांच्या मंत्रीपदाच्या विरोधासाठी त्याचप्रमाणे त्यांच्याकडे किमान पालकमंत्रीपद तरी सोपवले जाऊ नये, यासाठी फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आता विखे यांच्याकडे पालकमंत्रीपदही ओघाने येईलच.