कानपूर: कानपूर चकमक प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचण्यापूर्वी त्याला या कारवाईची माहिती मिळाली होती. ही माहिती त्याला पोलीस स्टेशनमधून आलेल्या फोनवरूनच मिळाली होती. ही माहिती मिळाल्यावर दुबे याने आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अटक करायला आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला होता, अशी माहिती विकास दुबेचा सहकारी दया शंकर अग्निहोत्री याने दिली आहे.
आज सकाळी पोलिसांनी दया शंकर अग्निहोत्रीला कल्याणपूरमधून अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास दुबेने 25-30 जणांना फोन केले होते, असे समजले. चकमक झाली तेंव्हा आपल्याला घरात बंद करून ठेवले गेले होते. त्यामुळे आपण काहीही बघू शकलो नाही, असेही अग्निहोत्रीने सांगितले.
गुरुवारी रात्री कानपूरमध्ये झालेल्या चकमकीत गुंड विकास दुबेला अटक करायला गेलेल्या प्लिसांवर गोळीबार झाला होता. त्यात 8 पोलीस कर्मचारी मारले गेले होते. या घटनेनंतर विकास दुबेचा फोटो नेपाळ सीमेवरील बहारिच जिल्ह्यातील रुपाइदिहा इथल्या चेकपोस्टला पाठवण्यात आला आहे.
दुबे औराइया इथे असल्याचा सुगावा लागला होता. तो उत्तर प्रदेशाची सीमा ओलांडून मध्यप्रदेशात किंवा राजस्थानात गेला असल्याची शंका व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी या दोन्ही राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला आहे. कानपूर चकमकीनंतर 55 तास उलटून गेल्यानंतरही उत्तर प्रदेश पोलीस आणि एटीएसला यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
दुबेच्या मोबाईल कॉल डिटेल्समधून 20 पोलीसांची नावे पुढे आली आहेत. तो दोन पोलीस आणि चौबेपूर पोलीस ठाण्यातील एका पोलिसाच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. चौबेपूर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार विनय तिवारी यांनी दुबेला वाचवण्याचा प्रयत्नही केल्याचे तपासात उघड झाले आहे.