नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मोर्चेबांधणी
थिरूवनंतपूरम : वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला (का) होणारा विरोध एकवटण्याच्या दृष्टीने केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी का विषयी भाजपेतर पक्षांची सत्ता असणाऱ्या 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यात विजयन यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
केरळ विधानसभेने नुकताच काविरोधी ठराव मंजूर केला. त्या ठरावाच्या माध्यमातून का रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर विजयन यांनी वादग्रस्त कायद्याच्या विरोधात आणखी एक पाऊल उचलताना मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. पत्र पाठवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे (महाराष्ट्र), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) आणि अरविंद केजरीवाल (दिल्ली) यांचाही समावेश आहे.
वादग्रस्त कायद्यामुळे अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मुल्यांचे जनत करण्याची इच्छा असलेल्या सर्व भारतीयांमध्ये एकोपा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याची भूमिका विजयन यांनी पत्रातून मांडली आहे. वादग्रस्त कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर, विजयन यांच्या कृतीचे महत्व वाढले आहे.