राजकोट – कर्णधार ऋतुराज गायकवाड याने केलेल्या अफलातून शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत मध्य प्रदेशचा 5 गडी राखून पराभव केला. मध्य प्रदेशने उभारलेल्या त्रिशतकी धावांचा यशस्वी पाठलाग करताना महाराष्ट्राच्या फलंदाजांनी त्यांच्या सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व राखले.
मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना कर्णधार आदित्य श्रीवास्तव व शुभम शर्मा यांनी दमदार शतकी खेळी केली. शर्माने 108 धावांच्या खेळीत 102 चेंडूत 10 चौकार व 2 षटकार फटकावले. श्रीवास्तवने आपल्या 104 धावांच्या खेळीत 82 चेंडूत 9 चौकार व 3 षटकार फटकावले. सलामीवीर अभिषेक भंडारीने 70 धावांची खेळी केली. मध्य प्रदेशने 50 षटकांत 6 गडी गमावून 328 धावांचा डोंगर उभारला.
विजयासाठी 329 धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरुवात कर्णधार ऋतुराज गायकवाड व यश नहारने शतकी सलामी देत थाटात केली. नहार मात्र, अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने 49 धावांची खेळी केली. त्यानंतर नौशाद शेखने 34, तर राहुल त्रिपाठीने अर्धशतकी खेळी करताना गायकवाडला सुरेख साथ दिली. गायकवाड 136 धावांची खेळी करून बाद झाला तेव्हा पराभवाचे संकट उभे राहिले होते. मात्र, अंकित बावणेने नाबाद 24 व स्वप्नील फुलपगारने नाबाद 22 धावांची खेळी केली व अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर 5 बाद 330 धावा नोंदवताना महाराष्ट्राचा विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक – मध्य प्रदेश – 50 षटकांत 6 बाद 328 धावा. (शुभम शर्मा 108, अभिषेक श्रीवास्तव 104, अभिषेक भंडारी 70, मुकेश चौधरी 2-54, अक्षय पालकर 2-86). महाराष्ट्र – 49.4 षटकांत 5 बाद 330 धावा. (ऋतुराज गायकवाड 136, राहुल त्रिपाठी 56, यश नहार 49, नौशाद शेख 34, अंकित बावणे नाबाद 24, स्वप्नील फुलपगार नाबाद 22, अमन भदोरिया 2-54).