राजकोट – कर्णधार ऋतूराज गायकवाडच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या उच्चांकी धावसंख्येच्या लढतीत चंडीगडवर 5 गडी राखून विजय मिळवला. ऋतूराजचे या स्पर्धेतील हे चौथे विक्रमी शतक ठरले.
ऋतूराजने नाणेफेक जिंकत चंडीगडला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरवताना चंडीगडच्या मनन व्होरा, अर्सन खान व अंकित कौशीक यांनी दमदार फलंदाजी केली. व्होराने 141 धावांची खेळी करताना 139 चेंडूत 13 चौकार व 2 षटकार फटकावले. पहिला गडी लवकर बाद झाल्यावरही त्याने अर्सन खानच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 195 धावांची भागीदारी केली.
खान 87 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 93 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 1 षटकार फटकावताना 87 धावा केल्या. तो बाद झाल्यावर कौशीकने व्होराला सुरेख साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी करत संघाला अडीचशे धावांची मजल मारुन दिली.
व्होरा बाद झाल्यावर त्याने फटकेबाजी करत संघाचे त्रिशतक साकार केले. त्याने आपल्या 56 धावांची खेळात 45 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावले. महाराष्ट्राकडून प्रदीप दाढेने 4 गडी बाद केले. मुकेश चौधरीने 2 तर, दिव्यांग हिंगणेकरने 1 गडी बाद केला.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना भरात असलेला महाराष्ट्राचा कर्णधार व सलामीवीर फलंदाज ऋतूराजने स्पर्धेतील चौथे शतक साकार केले. त्याने यश नहारसह शतकी सलामी देत विजयाचा पाया रचला.
या स्पर्धेत सातत्याने उपयुक्त खेळी करणारा नहार बाद झाल्यावर राहुल त्रिपाठी व नौशाद शेख यांनीही निराशा केली. एका बाजूने ऋतूराज आक्रमक फलंदाजी करत होता. त्याला सुरेख साथ देत आझीम काझीने आक्रमक नाबाद 73 धावांची खेळी केली.
दरम्यान, शतक साकार केल्यावर ऋतूराजने आपला धावांचा वेग वाढवला व दीडशतकाकडे कूच केले. 168 धावांवर तो बाद झाला. त्याने या खेळीत 132 चेंडूत 12 चौकार व तब्बल 6 षटकार लगावले. काझीला सुरेख साथ देताना अवधुत दांडेकरने नाबाद 16 धावांची खेळी केली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 43 धावांची अखंडीत भागीदारी करत संघाचा विजय साकार केला. चंडीगडकडून युवराज चौधरी व अर्पीत पन्नू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. गुरींदर सिंगने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – चंडीगड – 50 षटकांत 7 बाद 309 धावा. (मनन व्होरा 141, अर्सन खान 87, अंकित कौशीक 56, प्रदीप दाढे 4-49, मुकेश चौधरी 2-79, दिव्यांग हिंगणेकर 1-53). महाराष्ट्र – 48.5 षटकांत 5 बाद 313 धावा. (ऋतूराज गायकवाड 168, यश नहार 38, आझीम काझी नाबाद 73, अवधूत दांडेकर नाबाद 16, अर्पीत पन्नू 2-41, युवराज चौधरी 2-62, गुरींदर सिंग 1-55).