नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सम-विषम योजना आजपासून लागू केली आहे. या योजनेमुळे राजधानीतील प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आजपासून सुरू केलेल्या योजनेचा नक्कीच फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते सरकारवर या योजनेमुळे हल्लाबोल करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.
भाजपचे विजय गोयल यांनी आज सम दिवसाला विषम संख्याची गाडी क्रमांकाची गाडी रस्त्यावर आणत सरकारच्या या योजनेचा विरोध केला आहे. दरम्यान, त्यांच्या या कृतीमुळे त्यांना दंड भरावा लागला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर आरोप करत दिल्लीतील प्रदूषणाला राज्य सरकारच जबाबदार असून प्रदूषण नियंत्रण करण्याऐवजी सरकार जाहिरातबाजीवर खर्च जास्त करत असल्याचे गोयल यांनी म्हटले.
तसेच या सम-विषममधून अनेक गाड्यांना सुट देण्यात आली आहे त्यामुळे या कायद्याचा काहीही उपयोग नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, त्यांच्या या कृतीला दिल्लीचे परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांनी फुल देवून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या अगोदर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील केजरीवाल सरकारच्या या सम-विषम योजनेवर टीका केली.