मुंबई विमानतळावर डॉक्टर्स, वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चीन येथून आलेल्या एका जणाला मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सध्या मुंबई, पुणे आणि सांगली येथे सहा जण रुग्णालयात दाखल आहेत. सुमारे 83 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस सुरु असून त्यापैकी 26 जणांचा आरोग्यविषयक पाठपुराव्यास 14 दिवस पूर्ण झाल्याने तो आज थांबविण्यात आला आहे. मुंबई विमानतळावर आतापर्यंत 8 हजार 878 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मुंबई विमानतळावर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय प्रवासी तपासणीचे काम वाढल्याने मुंबई विमानतळावर आरोग्य अधिका-यांच्या मदतीला राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 10 वैद्यकीय अधिकारी आणि 15 आरोग्य कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 104 प्रवासी आले. 18 जानेवारी पासून त्यापैकी 18 जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी 18 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून उर्वरित तिघांचे प्रयोगशाळा निकाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. भरती झालेल्या 21 प्रवाशांपैकी 15 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात 1, नायडू रुग्णालयात 4 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 1 जण भरती आहे.
कोरोना संदर्भात बदलत्या परिस्थितीनुसार मार्गदर्शक सूचनांमध्येही काही महत्वाचे बदल करण्यात आले असून वुहान शहरातून येणा-या प्रवाशाला किंवा मागील 2 आठवड्या वुहान प्रवासाचा इतिहास असणाऱ्या प्रवाशाला लक्षणे असोत किंवा नसोत विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांची प्रयोगशाळा नमुना घेण्यात येईल.
बाधित भागातून 14 जानेवारी रोजी किंवा त्या नंतर येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा दिवसांसाठी करण्यात येणार आहे. पूर्वी या पाठपुरावा 28 दिवसांसाठी करण्याच्या सूचना होत्या. या काळात त्यांना काही लक्षणे आढळली तर त्यांना विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांचा प्रयोगशाळा नमुना घेण्यात येणार आहे.