सातारा – जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेमध्ये आणखी सतर्कता बाळगण्यात येत आहे. कार्यालयात आवश्यकता असेल तरच येण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असून गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के कर्मचारी उपस्थिती बंधनकारक करण्यात आल्याने दिवसेंदिवस कार्यालयात गर्दी वाढत आहे. काही शासकीय कार्यालयामध्ये करोनाने शिरकाव केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत असले तरी वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आणखी उपाययोजना आवश्यक होत्या.
करोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, खातेप्रमुखांची शुक्रवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद कार्यालयात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारातून शुक्रवारपासून प्रवेश देण्यात येत आहे. याठिकाणी थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करुन सॅनिटायझर देण्यात येत आहे. अत्यंत आवश्यक काम असेल आणि ज्या व्यक्तीचे काम आहे त्याच व्यक्तीलाच कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्येही विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कामकाजासंदर्भात काटेकोर नियमावली
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद इमारतीतील कामकाजासंदर्भात अत्यंत काटेकोर नियमावली अध्यक्ष उदय कबुले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्हा परिषदेची मुख्य इमारत आणि विस्तारित इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आणि अभ्यागत यांच्यासाठी मुख्य इमारतीचा एकच मार्ग सुरू राहणार आहे. अधिकारी, पदाधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्याच वाहनांना आवारात प्रवेश दिला जाईल.
ओळखपत्र बंधनकारक आहे. थर्मल तपासणी आणि सॅनिटायझर प्रवेशद्वारावरच बंधनकारक आहे. तळमजल्यावर टपाल व्यवस्था करण्यात आली आहे. या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची दिवसानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही विभागाचे टपाल तिथेच स्वीकारले जाईल. तालुका विभागाचे टपाल संबंधितांना तेथेच देण्यात येईल. इमारतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.