औरंगाबाद – प्रत्येक इमारतीत विद्युतीकरणाचे काम हे महत्त्वपूर्ण असते, विद्युत विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असल्याने औरंगाबादसारख्या शहरात व मध्यवर्ती ठिकाणी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
स्नेहनगर येथे अधीक्षक अभियंता (विद्युत) दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय, औरंगाबाद व सार्वजनिक बांधकाम उपविभाग (विद्युत) क्रमांक-2 या नुतन कार्यालयांचा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार संजय शिरसाठ, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार प्रदीप जैस्वाल आदी उपस्थित होते.
अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे औरंगाबाद येथे विद्युत विभागाचे दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे मुख्य कार्यालय निर्माण होणे हे होय आणि म्हणूनच या कार्यालयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे गुणवत्तापूर्वक व वेळेत काम होणे अपेक्षित आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग बंद करावा अशी मागणी पुर्वी होत होती. हा विभाग बंद नाही तर अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे आणि म्हणूनच 5 कोटीची टेंडर मर्यादा वाढवून 15 कोटीची टेंडर मर्यादा करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.