जिल्ह्यात 58 टक्के मतदान झाल्याने चुरशीच्या लढतींच्या ठिकाणी वाढली धाकधूक
पुणे – जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 जागांसाठी सोमवारी (दि.21) 58 टक्के मतदान झाले. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या 62 टक्क्यांच्या तुलनेत मतदानही घट झाल्याने 246 उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कमी झालेल्या मतदानाच फटका नेमका कोणाला बसणार याचे आकडेमोड आता सुरू झाली असून कमी मतदान झालेल्या मतदार संघातील उमेदवारांना निकालाची चिंता असणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण दहा मतदार संघात मतदानाची आकडेवारी पाहिली तरी ती उमेदवारांना चिंतेत टाकणारीच अशी आहे. जुन्नरमध्ये 2014 मध्ये 71 टक्के मतदान झालेले असताना यावेळी 63 टक्के मतदान झाले आहे. 8 टक्के मतदान कमी झाल्याने कमी झालेल्या मतांचा फटका नेमका कोणाला बसणार यावर येथील निकाल ठरणार आहे. जुन्नर मधून अतुल बेनके (राष्ट्रवादी)-आमदार शरद सोनवणे (शिवसेना) आणि आशा बुचके (अपक्ष) अशी लढत झाली असून ही तरंगी लढत चुरशीची ठरणार असल्याचेच संकेत आहेत. आंबेगाव तालुक्यातही तीन टक्क्यांनी मतदानात घट झाली असून मागील विधानसभेला 71 टक्क्यांवरील मतदान यावेळी 68 टक्क्यांवर घसरले आहे.
येथे दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) आणि राजाराम बाणखेले (शिवसेना) यांच्यात सरळ लढत असून विजयी उमेदवाराच्या मतामध्येही तेवढाच फरक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासह खेडमध्येही तीन टक्क्यांनी मतदान घटले आहे. गेल्यावेळी 70 टक्के मतदान झाले होते ते 67 टक्के झाल्याने याच फटका नेमका कोणाला, अशी चर्चा रंगली असून येथून दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी) शिवसेनेकडून आमदार सुरेश गोर आणि अपक्ष म्हणून अतुल देशमुख यांनी लढत दिली आहे. येथून विजयी होणारा मतदार अत्यल्प मतांनी विजयी होईल, असे संकेत आहेत. शिरूर-हवेली मतदार संघातही मतदानात घट झाली आहे.
गेल्यावेळचे 69.64 टक्के मतदार यावेळी 67 टक्क्यांवर घसरले केवळ दोन टक्के मतदार कमी झाले असले तरी येथे विद्यमान भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांनी मोठे आव्हान दिले असल्याची चर्चा आहे. हवेलीतून मतांचा टक्का वाढला असल्याने हा टक्का ज्याच्या बाजूने झुकेल तो उमेदवार विजयी होईल, असे ठोकताळे बांधले जात आहेत. दौंड तालुक्यात तब्बल 5 टक़्क्यांनी मतदान घटले आहे. 2014 मध्ये 73 टक्क्यांवरील मतदान यावेळी 68 टक्क्यांवर आल्याने कमी झालेला टक्का विद्यमान भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांच्याकरीता चिंतेचा ठरणार आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा नेमका कोणाला फटका बसणार यावर चर्चा झडू लागली आहे, घटलेल्या मतांची आकडेमोड
पावसाचा फटका…कुणाला झटका…
जिल्ह्यात सर्वच मतदार संघात मतदानाच्या अगोदरच्या दिवशी रविवारी (दि.20) मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील मतदानात घट होणार असल्याचा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला होता. यामुळे सोमवारी (दि.21) मतदाना वाढविण्याच्या दृष्टिने सर्वत्र प्रयत्न करण्यात आले. सकाळी सात वाजण्यापूर्वीच तयारी पूर्ण करण्यात येवून मतदानाकरीता अधिकाधिक वेळ कसा दिला जाईल, याकडे लक्ष दिले जात होते. मतदानाच्या दिवशीही बहुतांशी मतदार संघात पावसाची संततधार कायम होती.
काही ठिकाणी उघडीप मिळाल्यानंतर दुपारनंतर मतदारांची आकडेवारी वाढल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाला मतांची आकडेवारी वाढविण्याकरीता मोठी कसरत करावी लागली आहे. मतदान केंद्रावर मतदारांना आणण्याकरीता सर्वच राजकीय पक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठे प्रयत्न केले. यामुळे तरी मतदारसंघाची मतांची आकडेवारी 50 टक्यांच्या वर गेली. परंतु, यामुळे कमी झालेल्या मतांचा झटका आता नेमका कोणला? याचीही चिंता संबंधीतांना लागली आहे.